प्रतिनिधी /बेळगाव
कणबर्गी परिसराचा समावेश मनपात झाला आहे. मात्र, मनपाकडून येथील समस्यांकडे नेहमीच कानाडोळा करण्यात आला आहे. सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱया रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट आहे. परिणामी येथील रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने रस्त्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कणबर्गीतील प्रमुख रस्त्यांशेजारी गटारी बांधण्यात आल्या. काही रस्त्यांचा विकास करण्यात आला. प्रवेशद्वारावर असलेल्या तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. मात्र महत्त्वाचा आणि नागरिकांसाठी आवश्यक रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. सिद्धेश्वर मंदिरकडे जाणाऱया रस्त्यावर काही ठिकाणी काँक्रीट घातले आहे. काही भागाचे काँक्रिटीकरण केले नाही. परिणामी शाळेला येणाऱया विद्यार्थ्यांसह मंदिरकडे जाणाऱया नागरिकांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. गुडघाभर पाणी साचत असून ठिकठिकाणी चिखल झाला आहे. यातून मार्ग काढावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मंदिरकडे जाणाऱया रस्त्याचा विकास करून समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.