काही ठिकाणी पडझड, बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा : शास्त्राrनगर परिसरात छप्पर उडाले
बेळगाव : शहर परिसरात रविवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह वळिवाचा पाऊस झाला. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन कमी जास्त प्रमाणात गारपीठासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर बाजारासाठी शहरात आलेल्या नागरिकांना आजूबाजूच्या दुकानांचा आसरा घ्यावा लागला. मे अखेर आला तरी म्हणावा तसा वळीव अद्याप बरसला नाही. त्यामुळे वाढत्या उष्म्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी झालेल्या पावसाने काही प्रमाणात गारवा निर्माण झाला. मात्र शेतीच्या मशागतीसाठी मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे गटारी भरून रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे गटारीतील प्लास्टिक बॉटल आणि इतर कचरा देखील रस्त्यावरून वाहताना दिसला. त्यामुळे गटारी स्वच्छतेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. शहरात म्हणावा तसा दमदार वळीव झाला नसल्याने उष्म्याने जनता हैराण झाली आहे. दिवसेंदिवस पारा वाढत असल्याने वाढत्या झळांनी नागरिकांची लाहीलाही होऊ लागली आहे. शहराचा पारा 38 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत काही रस्तेदेखील ओस पडू लागले आहेत. यामुळे साऱ्यांना वळिवाची प्रतीक्षा आहे. एप्रिल महिन्यात काही ठिकाणी किरकोळ वळीव पाऊस झाला आहे. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एखादा वळीव झाला आहे. त्यानंतर वळिवाने दडी मारली आहे. त्यामुळे पाणी समस्या देखील दिवसेंदिवस गंभीर बनू लागली आहे. रविवारी ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत होता. त्यानंतर सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. पाऊस कमी असला तरी वाऱ्याचा वेग अधिक होता. दरम्यान शहर आणि परिसरात अर्धा तास पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाली. झाडे, विद्युत खांब आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. यंदा वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत म्हणावा तसा वळीव झाला नसल्याने शिवारात ओलावा नाही. त्यामुळे मशागतीची कामे देखील रखडली आहेत. शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी कामे रखडल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
कडोलकर गल्लीत गटारीचे पाणी रस्त्यावर, सर्वत्र दुर्गंधी
गणपत गल्ली, कडोलकर गल्लीमध्ये गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले. दरम्यान गटारीतील घाण रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली होती. शिवाय दलदल निर्माण होऊन रस्त्यावरून ये-जा करणे अडचणीचे झाले होते. मनपा स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षपणाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. पावसाळ्यापूर्वी गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
शास्त्राrनगर परिसरात छप्पर उडाले
रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे येळळूर रोड, खासबाग, आरपीडी कॉर्नर, शास्त्राrनगर परिसरात मोठी पडझड झाली आहे. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शास्त्राrनगर 5 वा क्रॉस येथील एका घरावरील छप्पर उडून गेले आहे. घरच्या स्लॅबवर घातलेले पत्रे खाली कोसळले आहेत. त्यामुळे घर मालकाला मोठा फटका बसला आहे.