पुढील चार दिवस जोरदार पावसाचे, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट
पुणे / प्रतिनिधी :
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरु असलेल्या पावसाने अवघ्या दहा ते अकरा दिवसांत जुलै महिन्याची सरासरी पार केली आहे. (Rainfall reached the July average) 1 जुलै ते 11 जुलैदरम्यान महाराष्ट्रात सरासरीच्या 110 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे, तर देशभरातही 1 जून ते 10 जुलैच्या कालावधीत सरासरीच्या 5 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, पावसाचे हे धूमशान महाराष्ट्र तसेच देशात पुढील चार दिवस कायम राहणार आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्राला पुढील तीन दिवस रेड अलर्ट, तर विदर्भात मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
जून महिन्यातील खंडानंतर जुलैत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 1 जुलै पासून सुरु असलेल्या पावसाने अद्यापही उसंत घेतलेली नाही. मान्सून सक्रिय झाल्याने पावसात वाढ होत आहे. सध्या ओरिसा किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याशिवाय गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान ट्रफ निर्माण झाला आहे. याच्या प्रभावामुळे गेल्या 24 तासांत गुजरात, विदर्भ, कोकण गोवा, तेलंगणा, छत्तीसगडच्या अतिवृष्टी झाली. पुढील 24 तास याचा प्रभाव कायम असेल. याबरोबरच गुजरात, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात मात्र पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा असून, किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे, तर विदर्भात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा अलर्ट असून, त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल.
महाराष्ट्रात सरासरीच्या 110 टक्के अधिकचा पाऊस
महाराष्ट्रात कोसळत असलेल्या सरींमुळे जुलै महिन्याची सरासरी पावसाने दहा दिवसांत गाठली आहे. 1 जुलै ते 11 जुलै पर्यंतच्या कालावधीत सरासरीच्या 110 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यांमध्ये आतापर्यंत अतिरिक्त पाऊस नोंदविण्यात आला आहे.
जिल्हानिहाय स्थिती पाहता राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये पावसाची स्थिती अत्यंत चांगली असून, सर्व जिल्हय़ांनी सरासरी ओलांडली आहे. यात पालघर सरासरीच्या 121, ठाणे 126, रायगड 100, रत्नागिरी 90, सिंधुदुर्ग 107, कोल्हापूर 98, सांगली 18, सातारा 127, पुणे 141, सोलापूर 76, मुंबई शहर 98, मुंबई उपनगर 155, नाशिक 191, नगर 26, नंदुरबार 95, धुळे 149, जळगाव 61, औरंगाबाद 78, बुलढाणा 36, जालना 84, बीड 86, उस्मानाबाद 109, लातूर 104, नांदेड 257, परभणी 111, हिंगोली 75, वाशिम 14, अकोला 16, अमरावती 64, यवतमाळ 102, वर्धा 181, चंद्रपूर 142, गडचिरोली 170, गोंदिया 62, भंडारा 66, नागपूर 113 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे.
रेडअलर्ट असलेले जिल्हे
पालघर – 12-13-14 जुलै
रायगड – 12-13 जुलै
रत्नागिरी – 12 जुलै
नाशिक -12, 13, 14 जुलै
पुणे – 12, 13, 14 जुलै
कोल्हापूर, गडचिरोली – 12 जुलै
मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ांना पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट असेल.
हेही वाचा : भुशी धरणात मुंबईचा पर्यटक बुडाला, शोध सुरू