समाजाच्या विकासासाठी योजना राबविणार : मल्टिस्टेट को-ऑप. बँक सुरू करणार
बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ आदी राज्यांमध्ये स्वत:ची बँकिंग व्यवस्था सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर मल्टिस्टेट को-ऑप. बँक लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी दिली. एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ते रविवारी बेळगावला आले होते. त्यावेळी सरकारी विश्रामधाम येथे त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मल्लेश चौगुले यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. आमचा पैसा आमच्या समाजाच्या विकासासाठी वापरण्याची संकल्पना आहे. त्यामुळेच मल्टिस्टेट को-ऑप. बँक उभी करण्यात येत आहे. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत ही बँक सुरू होणार आहे. प्रत्येकाचा आर्थिक विकास झाला पाहिजे. सद्यस्थितीत देश तोट्यात आहे. गौतम अदानी फायद्यात आहे, हे कसे शक्य आहे? असा प्रश्न उपस्थित करून स्वत:ची आर्थिक व्यवस्था उभी करण्यासाठी मल्टिस्टेट को-ऑप. बँक सुरू करण्यात येणार असल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.
देशात वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण महाग झाले आहे. सर्वसामान्य व गरिबांना ते परवडणारे नाही. म्हणून स्वत:ची शैक्षणिक प्रणाली विकसित केली जात आहे. यासाठी स्वत:चे कॉलेज, विद्यापीठे तयार करण्याची गरज आहे. कारण येथील परिस्थितीमुळे हुशार विद्यार्थी परदेशात जात आहेत. म्हणून नागपूर येथे 60 एकर जमिनीत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जागतिक विद्यापीठ उभारण्याचे काम सुरू आहे. आगामी दोन-तीन महिन्यांत जमीन ताब्यात आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी जगभरातील सतरा विद्यापीठांबरोबर चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. पुन्हा चातुर्वण्य पद्धत अमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून हे दिसून येते. या कार्यक्रमापासून राष्ट्रपतींना दूर ठेवण्यात आले. एक तर त्या महिला आहेत आणि आदिवासी आहेत म्हणून त्यांना दूर ठेवण्यात आले आहे. हा देश धर्मनिरपेक्षता मानणारा आहे. देशात साधनसंपत्तीची कमतरता नाही. केवळ दृष्टीचा अभाव आहे. समाजाला दृष्टी देण्यासाठी, नवी दिशा देण्यासाठी आपले काम सुरू आहे. संपूर्ण देशाचे खासगीकरण सुरू आहे. त्यामुळे नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. प्रत्येकाचे उत्पन्न धोक्यात येणार आहे. म्हणून समाजाला दिशा देण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.