वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केल्याच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या एक मारेकरी एम. टी. संथान हा त्याच्या घरी परतण्यास उत्सुक आहे. त्याला राजीव गांधी हत्या प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने 11 नोव्हेंबर 2022 या दिवशी या प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या 6 गुन्हेगारांची सुटका करण्याचा आदेश दिला होता. या गुन्हेगारांमध्ये संथान याचाही समावेश होता. तो श्रीलंकेचा नागरीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याची अद्याप सुटका न झाल्याने त्याने एक खुले पत्र पाठविले असून त्यात आपल्याला आपल्या घरची आठवण येत असून त्वरित आपली सुटका करावी, अशी विनंती त्याने अधिकाऱ्यांना केली आहे. सध्या या प्रकरणातील सर्व गुन्हेगार त्रिची येथील कारागृहात आहेत.