खादरवाडी गावाला यात्रेनिमित्त पुरविले टँकरद्वारे पाणी
वार्ताहर /किणये
खादरवाडी गावातील जागृत मरगाईदेवी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेनिमित्त खादरवाडी गावातील नागरिकांना टँकरचे पाणी देऊन सोय करण्यात आली आहे. या पाण्याच्या सोयीसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी आपले दातृत्व दाखविले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करून त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. खादरवाडी गावात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना यात्रेसाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. या नागरिकांची अडचण लक्षात घेऊन श्रीराम सेना हिंदुस्थान शाखा व महाराष्ट्र एकीकरण समिती शाखा खादरवाडी यांच्या वतीने रमाकांत कोंडुस्कर यांनी नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांची अडचण दूर व्हावी आणि यात्रेमध्ये त्यांना पाण्याची कमतरता पडू नये यासाठी रमाकांत कोंडुस्कर यांनी टॅंकरने पाणीपुरवठा करून खादरवाडी गावातील नागरिकांची सोय केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे गावात कौतुक होत आहे. ऐन यात्रेच्या काळात आपल्या दारापर्यंत टँकरने पाणी मिळाले असल्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.