भगवान रामावर कोणाचा मालकी हक्क आहे का? हा प्रश्न राजकारणात फार वेळा विचारला जातो. या प्रश्नावर देशात गेली तीन दशके मोठच रणकंदन माजलेले आहे. आता जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे तेव्हा या प्रश्नावर कलगीतुरा वाढू लागला आहे, वाढणार आहे. सत्तेच्या सारीपाटावर रामाला देखील एक मोहरा बनवले जात आहे असे कोणाचे मत आहे तर अणुअणुत असलेला राम सगळीकडे असणारच असा काहींचा होरा दिसतोय. ‘तुम्ही रामाचे की रोमचे?’ असा प्रश्न विचारून पूर्वी सोनिया गांधींच्या विदेशी मुळाविषयी खूप प्रचार केला गेला होता.
नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटकमधील निवडणूकात बजरंग बलीचा वापर केला गेला त्याने कोण तोंडघशी पडले ते सगळ्यांनाच माहित आहे. तात्पर्य काय तर अशी नाणी वापरायची ठरवली तर सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात वापरता येतात. काँग्रेस शासित छत्तीसगढमध्ये तेथील भूपेश बघेल सरकारने एक भव्य राष्ट्रीय रामायण महोत्सव आयोजित केलेला आहे. माता कौसल्या ही मूळची छत्तीसगढची असल्याने भगवान राम हा तिथला भाचा आहे. त्या भागात म्हणून भाच्याला फार महत्त्व आहे. त्याला आदरार्थी संबोधिले जाते. विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आलेली असताना बघेल यांनी असा महोत्सव आयोजित करून एक प्रकारे भाजपची कोंडीच केली आहे असे मानले जाते.
अगोदर पंधरा वर्षे भाजप सत्तेत असताना त्याने रामाचे आजोळ असलेल्या या राज्यात त्यासंबंधी काहीच काम केलेले नाही असे आरोप सत्ताधारी करू लागले आहेत. रामावर आपलाही हक्क आहे असे सांगण्याचा हा काँग्रेसी डाव निवडणुकीत किती रंग भरणार हे लवकरच कळेल. छत्तीसगढमधील नेतृत्वाच्या प्रश्नावर भाजपची गोची झालेली दिसत आहे. भाजपचे आदिवासी नेते नंदकुमार साई यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपमधील अंतर्गत दुफळी चव्हाट्यावर आणली. पंधरा वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या रमण सिंग यांना भाजपने किनाऱ्याला लावले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले रमेश बायस हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होऊ शकतात असे बोलले जात आहे. काँग्रेसमध्ये बघेल आणि ज्येष्ठ मंत्री टी पी सिंगदेव यांच्यामध्ये देखील नेतृत्वाच्या मुद्यावर वाद आहेत. कर्नाटकमधील भाजपच्या पराभवाने राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेदेखील आक्रमक झाले आहेत. हनुमानाने भाजपचा कर्नाटकात पराभव करून आपण सगळ्यांचे आहोत असे दाखवून दिलेले आहे. उत्तरेत हनुमानाचे जबर प्रस्थ असल्याने भाजपला शह देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्यासारखे धूर्त मुख्यमंत्री आपण बजरंग बलीचे कसे निस्सीम उपासक आहोत हे हनुमान मंदिरात वेळोवेळी दर्शनाला जाऊन दाखवतात. दिल्ली सरकारने ज्येष्ठ नागरिकांकरिता अयोध्येसह बऱ्याच देवी देवतांना भेट घडवण्यासाठी एक मोफत तीर्थयात्री योजना सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या नवीन संसद भवनाच्या उदघाटनाच्या वेळी मोदी सरकारने दक्षिणेकडील बरेच संत महंत बोलावले होते पण उत्तरेतील संत महंतांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले असे आरोप बिहार-उत्तर प्रदेशमधील विरोधक करू लागले आहेत. भाजपला नवी दिल्ली काबीज करण्याकरता उत्तरेत जिंकायला आवड्ते पण तेथील लोकांना ती फारशी किंमत देत नाही असा प्रचार त्यामुळे सुरु झाला नसता तरच नवल होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्याने ‘शबरीच्या वंशातील’ आहेत. त्यांनाच या उदघाटन सोहोळ्यापासून दूर ठेवून भाजपने आपण रामभक्त नाही असेच दाखवले आहे असा युक्तिवाद होत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजयी करून बजरंग बली मध्यप्रदेशमध्ये भोपाळला रवाना झाले आहेत आणि आपले परमभक्त कमलनाथ यांना आशीर्वाद देत आहेत असे दावे काँग्रेसने सुरु केले आहेत. उज्जैनमधील महाकाल मंदिरात जाण्यासाठी 840 कोटी रुपये खर्चून एक मोठा कॉरिडॉर बांधण्यात आलेला आहे. पण गेल्या आठवड्यात तिथे आलेल्या वादळात सप्तर्षींच्या सात पुतळ्यांपैकी सहा पडून गेल्याने सत्ताधाऱ्यांवर शिवशंकराचा प्रकोप झाला आहे असा प्रचार सुरु झाला आहे. महाकालाच्या मंदिरातील प्रकल्पात ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय तो सोडणार नाही असे भक्तमंडळी म्हणत आहेत. उज्जैनमधील या पडझडीचा राष्ट्रीय स्तरावर फारसा प्रचार-प्रसार होणार नाही याची खबरदारी राज्यकर्त्यांनी घेतलेली आहे पण झाला प्रकार हा शुभशकुन नाही असे सत्ताधारी वर्ग देखील मानू लागला आहे. मध्यप्रदेशमध्ये काशी, मथुरा, ज्ञानवापी, हिजाब हे भाजपकरता मुद्दे राहणार नाहीत असे तेथील प्रभारी मुरलीधर राव सांगत आहेत. काँग्रेसमधून आलेले ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक येत्या निवडणुकीत कसे अॅडजस्ट करायचे हा मोठा मुद्दा भाजपकरता बनत चालला आहे असे दिसत आहे. कानामागून आले आणि तिखट झाले अशी त्यांच्याविषयीची भावना भाजपच्या निष्ठावंत मंडळींमध्ये आहे. त्यामुळे गटातटांची जुंपली आहे. राजस्थानमध्ये गेल्या चार वर्षात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पक्षश्रेष्ठींनी ‘वनवासात’ पाठवल्याने भाजपमध्ये राम उरलेला नाही असे एक गट मानत आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधानांनी अजमेरपासून राष्ट्रीय जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली तेव्हा राजे यांना मंचावर शेजारी बसवून या गटाचे म्हणणे ऐकलेले दिसत आहे. इतकी वर्षे अपमान झेललेल्या वसुंधरांनी कोपराने खणायचे ठरवले तर मात्र बाका प्रसंग उदभवेल. हिंदुत्वाच्या मुद्यावर तेलंगणातील भाजपमध्ये दोन उभे गट पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत यश हवे असेल तर जहाल हिंदुत्वाची मात्रा उगाळली पाहिजे असे एक गट म्हणत आहे तर दुसरा गट कर्नाटकमध्ये हिंदुत्वाचा बोजवारा वाजला आहे असे प्रतिपादन करत आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कारभाराचे पितळ उघडे करूनच भाजपला सत्ता मिळू शकते असे या गटाचे मत आहे. उत्तरप्रदेशमधील भाजपचा प्रतिस्पर्धी असलेला समाजवादी पक्ष देखील हळूहळू हिंदुत्वाचे गोडवे गाताना दिसू लागला आहे. मुलायमसिंग यादव हयात असताना त्यांना मौलाना मुलायम अशी उपाधी भाजपने दिली होती. त्याने मुस्लिम समाजाची मते अतिशय अलगदपणे त्यांच्या झोळीत पडत होती. भाजपची हिंदुत्वचा मतपेढी दुसरीकडे घट्ट होत होती. दोघांचे चांगभले होत होते.
अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांची एक बैठक निमिषारण्यात आयोजित केली आहे. या निमिषारण्याचे वैशिट्या असे की पुरातन काळात महर्षी वेद व्यास यांनी 88,000 ऋषीचा तिथे एक वर्ग घेऊन त्यांना वेद, पुराणे याविषयी सविस्तर विवेचन केले होते. समाजवादी पक्षाच्या या अभ्यासवर्गापूर्वी अखिलेश आणि पक्षातील ज्येष्ठ मंडळी ही हवन आणि पूजापाठ करणार आहेत. येत्या जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात अयोध्येतील राम मंदिराचे उदघाट्न पंतप्रधान करणार असल्याने घाबरलेले अखिलेश ‘सॉफ्ट हिंदुत्वाचा’ डाव खेळू लागले आहेत. मरता क्या नही करता? गमतीची गोष्ट अशी की कर्नाटकमधील विजयाने उत्तरप्रदेशमधील मुसलमान समाजाला काँग्रेसबाबत परत आपुलकी वाटू लागली आहे. हिंदुत्वावर केवळ भाजपची मत्तेदारी आहे असे सांगण्याचा खेळ अयोध्येहून परत सुरु होईल. फेब्रुवारी-मार्चमध्ये लोकसभा निवडणूका घोषित होतील आणि भाजपची बल्लेबल्ले होईल अशी अपेक्षा आहे. निवडणुकीकडे बघुनच राम मंदिराचे उदघाटन आयोजित केले गेलेले आहे. इकडे मंदिर उघडणार आणि दुसरीकडे मतपेट्या भरणार असा सत्ताधाऱ्यांचा समज आहे.
सुनील गाताडे