काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही कायद्यानुसार झाली असून यामध्ये भाजपाचा (BJP) काही संबंध नाही. या पुर्वीही एकवेळ त्यांना माफीही मागावी लागल्यामुळे राहुल गांधींना (Rahul Gandhi) तारतम्य बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे. तसेच 2024 मध्ये एनडीएचे सरकार येणार आहे. नागालँडप्रमाणे केंद्रातही राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामिल व्हावे असा सल्ला शरद पवार (Sharad Pawar) यांना दिला. ते आज सांगली दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही कायद्यानुसार आहे. यामध्ये भाजपाचा काहीही संबंध नाही. राहूल गांधींनी अनेकवेळा चुकीची वक्तव्ये केली आहेत. तसेच एकवेळ त्यांना माफीही मागावी लागली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी बोलताना तारतम्य बाळगण्याची गरज आहे.” असा सल्ला मंत्री आठवले यांनी राहूल गांधी यांना दिला आहे.
तसेच शरदव पवार यांना एनडीएत सामिल होण्याबाबत सल्ला देताना आठवले म्हणाले, “ज्या पद्धतीने नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे सरकार असून राष्ट्रवादी भाजपबरोबर आहे. त्याच पध्दतीने शरद पवार यांनी एनडीएबरोबर यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे चांगले संबंध असून मोदींनी अनेकवेळा शरद पवारांचं कौतुकही केलं आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तरी 2024 मध्ये पुन्हा एनडीएचीच सत्ता येणार आहे.” असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.