मिऱ्या धुपपतिबंधक बंधाऱ्याचे १६९ कोटींचे काम रखडलेलेच; बंधारा समितीचे अध्यक्ष आप्पा वांदरकर करणार आमरण उपोषण
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरीचा मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कोट्यावधीचा निधीतून होणारी दुरूस्ती म्हणजे मृगजळ सल्याचा भास येथील ग्रामस्थांना होत आहे. या धुप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी स्तरावरील पाठपुराव्यामुळे शासनाकडून निधी मंजूर होतो. पण गेल्या अनेक वर्षांपासूनचे बंधाऱ्याचे काम अजूनही मार्गी लागण्याची चिन्हे नाहीत. गतवर्षी डिसेंबर २०२२ मध्ये या बंधाऱ्यांच्या कामाचा नारळ फुटलाय…पण त्या कामाचा एक दगडही सरकलेला नाही.
त्यामुळे संबधित काम करणारा पतन विभाग व ठेकेदार यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थ शांताराम उर्फ आप्पा वांदरकर येत्या ८ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला प्रारंभ करणार आहेत. मिऱ्या किनाऱ्याची पावसाळ्यामध्ये उधाणात प्रचंड धूप होते. समुद्राचे अतिक्रमण स्थानिकांच्या सातबाऱ्यावर आलेले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये नारळाच्या बागा, घरांच्या संरक्षण भिंतीही समुद्राने गिळंकृत
केलेल्या ओहत. तरीही आज बंधारा दुरूस्ती कामाची स्थिती जैसे थे’च असल्याची प्रचिती याठिकाणी येत आहे.
धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या प्रस्तावित केलेल्या १६९ कोटीच्या कामाचा २६ डिसेंबर २०२१ मध्ये राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मोठ्या दणक्यात भूमिपूजन सोहळा झाला. पण गेल्या ९ महिन्यात साडेतीन किलोमीटरच्या बंधाऱ्यापैकी आजतागायत कामाला गती मिळालेली नाही. हे काम रेंगाळलेलेच आहे. आता तर पावसाळ्यात यापूर्वीच वाताहात उडालेल्या धुपपतिबंधाऱ्याची आणखीनच वाताहात उडालेली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर बंधाऱ्यांची डागडुजीही रखडलेली होती. पावसाळ्यात भगदाडे पडलेल्या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीचे निमित्त दाखवण्यात आले, पण उधाणात ती तकलादू दुरूस्तीही वाहून गेलेली आहे.
मिऱ्या धूपप्रतिबंधक पक्का स्वरुपाच्या बंधाऱ्याचे सुमारे १८९ कोटीच्या कामांसह पावसापूर्वीच्या धोकादायक भागाच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये स्थानिकांना पत्तन विभागाने विश्वासात न घेतल्याने प्रचंड नाराजी आहे. त्या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थांनी नुकतीच पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट येथील पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंबे आलावा बंधारा समितीने घेतली. या भेटीमध्येही त्यांनी अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केलेले होते. ही कामे दर्जेदार व्हावी आणि शासनाचा अर्थात जनतेचा पैसा वाया जाऊ नये अशी स्थानिकांची मागणी आहे. पण लाखो रुपये खर्ची पडणाऱ्या या बंधाऱ्यांचा प्रश्न आजही अनेक वर्षे खितपत पडलेला आहे. याबाबत कार्यकारी पतनअभियंता व ठेकेदार यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मिऱ्या बंधारा समितीचे अध्यक्ष शांताराम ऊर्प आप्पा वांदरकर ८ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरुवात करणार आहेत.