पोफळीतील पूर्वेकडील पर्वतरांगात पाण्याचा विसर्ग; कोणताही धोका नसून केवळ पाण्याचे नुकसान होत असल्याचे जलसंपदाकडून स्पष्टीकरण; पाच वर्षांपासून दुरूस्तीचा प्रस्ताव प्रलंबित
चिपळूण प्रतिनिधी
पोफळीच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मंगळवारी धबधब्यासारखा पाण्याचा विसर्ग वाहू लागल्याने सर्वत्र घबराट पसरली. मात्र यामध्ये कोणताही धोका नसून हे पाणी कोयना वीज प्रकल्पाच्या उलोळ विहीर किंवा पोफळीतील सर्जवेलला गळती लागून पुढे ईव्हीटीमध्ये येऊन झिरपत आहे. तेच पाणी सह्याद्रीच्या डोंगरातून वाहत असल्याचे स्पष्टीकरण मंगळवारी सायंकाळी जलसंपदाच्या बांधकाम विभागाने दिले आहे. मात्र यानिमित्ताने गेली अनेक वर्षे सर्जवेलच्या दुरूस्तीकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरले असल्याचे पुढे आले आहे.
गेल्या 4 ते 5 वर्षांपासून ही गळती सुरू आहे. मात्र गळतीचे प्रमाण कमी असल्याने ती दुर्लक्षित राहिली. पावसाळ्यातही पाण्याचा विसर्ग होत होता. मात्र धबधब्याचे पाणी असेल म्हणून लक्ष दिले गेलेले नाही. मात्र आता काही प्रमाणात त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी कोयना धरणाला भगदाड किंवा कोयना धरणातील पाण्याला गळती अशाप्रकारचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. मात्र जलसंपदाच्या बांधकाम विभागाने वृत्त तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले.
कोयना धरण पूर्व दिशेला आहे, तर पश्चिमेला कोयना वीज प्रकल्प आहे. वीज प्रकल्पाच्या टप्पा 1 व 2 मधील सर्जवेलला गळती लागून पाणी झिरपल्याने हे पाणी सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून वाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात जलसंपदाचे निवृत्त सचिव व कोयना धरणाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक म्हणाले की, कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेल निघतं, या बोगद्याच्या शेवटी एक उलोळ विहीर किंवा सर्जवेल बांधलेली आहे. या विहीरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल 1960मध्ये बांधून पूर्ण झाली असून ती सह्याद्रीच्या कातळात 100 मीटर खोल खोदलेली आहे. या विहिरीला अर्ध्या मीटर रुंदीचे काँक्रीट अस्तरीकरण केलेले आहे. या विहिरीला गेली 60 वर्षे झाली असून तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवले आहेत. मात्र आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल (ईव्हीटी) किंवा आपत्कालीन झडपद्वार भुयारामध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडत आहे.
गेली 4 ते 5 वर्षे हा प्रकार सुरू आहे. यामुळे वीजगृहाला व कोयना जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही. केवळ पाणी वाया जात आहे. हे पाणी साधारण 3 घनफूट प्रा†तसेकंद एवढे असावे. पोफळी सर्जवेलची जागा अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यामुळे तिथे मशिनरी नेऊन दुरुस्ती करणे सहज सोपे नाही. दुरुस्तीसाठी वीजानिर्मिती बंद ठेवावी लागेल व दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच शक्य आहे. या सर्व कारणामुळे गेली चार-पाच वर्षे दुरुस्तीचे काम रेंगाळले आहे. यात घाबरण्यासारखी किंवा गोंधळल्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.