गावखडीतील सहदेव पावसकर, गोळपचे प्रकाश उर्फ बावा साळवी यांनी पटकावला मान; सुमारे 20 हजाराचा दर पेटीला मिळण्याची व्यक्त केली अपेक्षा
रत्नागिरी प्रतिनिधी
हापूसचा हंगाम यावेळेस निसर्गाच्या लहरी वातावरणातून मार्गकमण करत आहे. पण 2023 या नववर्षाच्या प्रारंभालाच रत्नागिरी तालुक्यातील दोन बागायतदार शेतकऱ्यांनी पहिल्या आंब्याची तोड करून हापूसची पेटी पुणे व मुंबईच्या मार्केटमध्ये पाठवण्याचा मान मिळवला आहे. या पेटीला अंदाजे 20 हजार रूपयाचा भाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हापूसच्या हंगामाचा प्रारंभ प्रामुख्याने डिसेंबर या महिन्यापासून होत असतो. पण मागील 2022 मध्ये ऑक्टोबनंतरही पावसाचा मुक्काम लांबला. हापूसला पोषक वातावरण असलेल्या थंडीमध्ये सातत्य राहिलेले नाही. त्यामुळे आंबा कलमांना म्हणावा तितकी मोहोर धारणा होताना दिसत नसल्याने बागायतदार काहीसे चिंतेत पडलेले आहेत. कधी धंडी तर कधी अचानक उष्म्यात वाढ…तर पावसाची सावट यामुळे आंबा हंगाम चांगलाच कचाट्यात सापडला आहे. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सहदेव पावसकर यांनी जिह्यातील हापूसची पहिली पेटी सोमवारी पुणे येथे पाठवली आहे. गावखडी येथील सहदेव पावसकर यांच्या बागेतील आंब्याला सप्टेंबर महिन्यात मोहर आला होता. या मोहराचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी आंब्याच्या बाजूने नेट लावलं. तसेच आंब्यावर छप्परही टाकलं होतं. अखेर त्यांच्या मेहनतीला यश आलं आहे. त्यांनी तयार झालेल्या आंब्याची तोड सोमवारी केली. त्या तोडणी केलेल्या 48 आंब्याची पहिली पेटी पुणे येथे पाठवली आहे. या पेटीला जवळपास 20 हजार रुपये दर मिळेल अशी अपेक्षा पावसकर यांनी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर गोळप येथील बागायतदार शेतकरी तथा कोकण हापूस आंबा उत्पादन आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था उपाध्यक्ष प्रकाश उर्फ बावा साळवी यांनीही हंगामातील पहिल्या हापूसची तोड केली आहे. त्यांनी 2 डझनाची पहिली पेटी मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये रवाना केली आहे.