ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे-फडणवीस सरकार मजबूत आहे. अजूनही आम्हाला 20 ते 25 आमदारांचं छुपं समर्थन आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पडू नये, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.
बावनकुळे म्हणाले, आम्हाला अजूनही 20-25 आमदारांचा छुपं समर्थन आहे. त्यामुळे आमची 164 आमदारांची संख्या पुढे 184 पर्यंत जाईल. त्यामुळे संजय राऊत यांनी काळजी करण्याची गरज नाही. सरकार पाडण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये.
राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांचा रेडे म्हणून उल्लेख केला होता. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, ज्या दिवशी तुम्ही आमदारांना धनुष्यबाण दिले होते, त्या दिवशी ते माणूस होते, शिवसैनिक होते, निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र, आता ते तुमच्या हुकूमशाहीमुळे उद्ध्वस्त झाले. आता तुम्ही त्यांना रेडे म्हणत आहात. त्यांना लाखो लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांना रेडे म्हणणं लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेचा अपमान आहे. आता संजय राऊत यांनी अशी भाषा सोडावी आणि पक्ष सांभाळावा.
अधिक वाचा : दाऊदच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट; मुंबई पोलिसांना मिळाला ऑडिओ मेसेज
उद्धव ठाकरे ओवैसी, आझमी यांच्यासोबतही युती करतील
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या ‘शिवशक्ती-भिमशक्ती’च्या नव्या राजकीय आघाडीची चर्चा सध्या रंगत आहे. यावर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवैसी यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबतही युती करु शकतात, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.