काकती ग्रामस्थांचा इशारा : रिंगरोडच्या सर्वेक्षणासाठी शेतजमिनीवर आलेल्या अधिकाऱ्यांना लावले पिटाळून
वार्ताहर /काकती
होनगा-बेन्नाळी येथील शेतकरी वर्षभरात तीन पिके घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणासाठी पुन्हा नुकत्याच शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीत रिंगरोडच्या बांधकामासाठी पुन्हा घाट घालण्यात आला आहे. रिंगरोडच्या सर्वेक्षणासाठी सोमवारी शेतजमिनीवर आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीन देणार नाही. आम्ही शेतीवर जगतो. कोणताही संघर्ष करायला मागे-पुढे पाहणार नाही, असा सज्जड इशारा देऊन शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. सोमवारी दुपारी शासनाचे सर्व्हेक्षण अधिकारी, समन्वय व्यवस्थापक महिला अधिकारी आदींनी रिंगरोडमध्ये जाणाऱ्या शेतजमिनीची पाहणी केली. शेतकऱ्यांना समजावून सांगताना महिला अधिकारी म्हणाल्या, शहराच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उद्देशाने सरकारने रिंगरोड करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रिंगरोडसाठी जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पण, शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झाल्या आणि ते म्हणाले, वडिलोपार्जित वारसा हक्काने कसत असलेली जमीन कायमची हिसकावून घेतल्यास आम्ही शेतकरी जगायचे कसे. या रिंगरोडच्या प्रस्तावात रिंगरोड व सर्कल मिळून 12 एकर जमीन माझी एकट्याची जाणार आहे, असे किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा अधिकारी अनुत्तरीत झाले.
सरकारने शेतकऱ्यांच्या जिवावर उठू नये
या रिंगरोडच्या रस्त्या व्यतिरिक्त जवळपास 100 एकर जमीन जात असेल तर शेतकऱ्यांनी जगावे कसे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या जिवावर उठू नये. शेतकरी हा अन्नदाता आहे. देशाचे भवितव्य कृषी विकासात आहे. देश कृषीप्रधान असल्यामुळे कोरोना काळात आर्थिक मंदी होती. तरीही कृषी विकासामुळे देशाला झळ बसली नाही. अशा संतप्त भवना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
मंत्री सतीश जारकीहोळी यांना आज भेटणार
बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना मंगळवारी भेटून रिंगरोडला विरोध करणार असल्याचे शेतकऱ्यांनी ठरविले. यावेळी माजी एपीएमसी अध्यक्ष आनंद पाटील, अॅड. बी. एल. टक्केकर, नागेश पाटील, परशराम यल्लाण्णाचे, यल्लाप्पा पावले, नाना टक्केकर, विलास यल्लाण्णाचे, देवाप्पा पाटील, यल्लाप्पा चौगुलेंसह होनगा-बेन्नाळीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.