कृष्णात चौगले,कोल्हापूर प्रतिनिधी
Kolhapur BJP News: जिह्यातील ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष रुजवला,वाढवला तेच कार्यकर्ते आज अडगळीत पडले असून नवीन कार्यकर्ते मात्र व्यासपीठावर दिसत आहेत.जुन्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडून मानाचे स्थान दिले जात नाही.भाजप (B) सत्तेवर आल्यापासून अनेक नवीन कार्यकर्ते पक्षात आले असून त्यांनाच महत्वाची पदे दिली जात आहेत.आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळवायचे असेल तर नवीन कार्यकर्त्यांबरोबरच जुन्या कार्यकर्त्यांना देखील सन्मानाची वागणूक द्यावी.अन्यथा त्यांची नाराजी पक्षाच्या यशस्वी वाटचालीमध्ये अडथळा ठरेल,अशी खदखद भाजपच्या समन्वय समितीच्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
भाजपचे प्रवक्ते माजी आमदार मधू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल आयोध्या येथे भाजपच्या नवीन व जुन्या कार्यकर्त्यांची समन्वय बैठक पार पडली.यावेळी खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik),पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव ,वस्त्रोद्योग यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदूराव शेळके,महानगराध्यक्ष राहूल चिकोडे,अशोक देसाई,बाबा देसाई,संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील आदींसह जिह्यातील तीनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
जुन्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्या
भाजप सत्तेवर येण्यापूर्वी ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला,त्या कार्यकर्त्यांना आता पक्ष सत्तेत असताना गौण स्थान दिले जात आहे.त्यांच्या योगदानाची नेत्यांना कोणतीही जाणिव नाही. यापुढे भाजपची यशस्वी घौडदौड कायम राखायची असेल तर जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांच्या अनेक वर्षांच्या पक्षीय अनुभवाचा वापर करून घ्यावा.तरच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे उद्दीष्ट साध्य होऊ शकेल अशा तक्रारवजा सूचना कार्यकर्त्यांनी समन्वय बैठकीत मांडल्या. उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना आपली तक्रार मांडायची होती.पण केवळ 30 ते 35 कार्यकर्तेच व्यक्त होऊ शकले.सदरची बैठक जिह्याच्या ग्रामीण भागातील असताना महानगराचे पदाधिकारी व्यासपीठावर आणि जिह्यातील पदाधिकारी खाली का ? तसेच ज्यांच्या विरोधात तक्रार मांडायची होती, तेच व्यासपीठावर असतील तर आम्ही व्यक्त कसे व्हायचे ? असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केले.
पन्हाळा तालुका जनसुराज्यला ‘आंदण’ दिला आहे काय ?
जनसुराज्य शक्ती पक्ष हा भाजपचा सहयोगी पक्ष असल्यामुळे पन्हाळा तालुक्यातील विकासकामे मंजूरीचे आणि शासकीय समित्या गठीत करण्याचे बहुतांशी अधिकार जनसुराज्यला दिले आहेत. हा तालुका जनसुराज्यला ‘आंदण’ दिल्यामुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते अडगळीत पडले आहेत. त्यांना पक्षाकडून उभारी दिली जात नसल्याची खंत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
भाजपचे लक्ष, 400 प्लस
यावेळी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढताना माजी आमदार मधू चव्हाण म्हणाले,आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला 400 हून अधिक जागांवर यश मिळवायचे आहे.त्यामुळे जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरुन समन्वयाने एकत्र येवून काम करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी लवकरच कोअर कमिटी गठीत केली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी कमिटीपुढे मांडाव्यात.
तालुकास्तरीय बैठका घ्या
जिल्हा पातळीवरील समन्वय समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी मर्यादा येत आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत कार्यकर्त्यांच्या तालुका पातळीवर बैठका घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.