मतदारयादी-मतदान ओळखपत्राच्या कामासाठी नागरिकांना मुख्य कार्यालयात जावे लागणार
प्रतिनिधी /बेळगाव
गणाचारी गल्ली येथील जुन्या कार्यालयात मनपाचा निवडणूक विभाग कार्यरत होता. मात्र सदर कार्यालय सुभाषनगर येथील मुख्य कार्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. मुख्य कार्यालयातील नगर योजना विभागाच्या वरच्या मजल्यावर हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारयादी किंवा मतदान ओळखपत्राच्या कामासाठी मुख्य कार्यालयात जावे लागणार आहे.
महानगरपालिकेचे जुने कार्यालय रिसालदार गल्ली येथील इमारतीमध्ये होते. 2008 मध्ये मनपाचा कारभार नव्याने उभारण्यात आलेल्या सुभाषनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आला होता. मात्र काही विभाग जुन्या कार्यालयात कार्यरत आहे. निवडणूक विभाग आणि विभागीय महसूल कार्यालय जुन्या कार्यालयातच होते. गणाचारी गल्लीत असलेल्या इमारतीमध्ये निवडणूक विभागाचे कामकाज चालत होते. महापालिका मतदारयादी, मतदारयादीतील चुकीची दुरुस्ती, मतदारयादीत नाव दाखल करणे किंवा कमी करणे याकरिता गणाचारी गल्लीतील कार्यालयात अर्ज करावे लागत होते. महापालिका आणि अन्य निवडणुकांचे बहुतांश कामकाज गणाचारी गल्लीतील कार्यालयात चालत होते. मात्र महापालिकेच्या कर्मचाऱयांना प्रत्येक कामासाठी मुख्य कार्यालयात ये-जा करावी लागत होती. त्यामुळे निवडणूक विभागाचा कारभार मुख्य कार्यालयात स्थलांतर करण्यात आला आहे.
नगरयोजना विभागातील कक्षात पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली होती. त्यामुळे या कक्षाच्या वरच्या मजल्यावर नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या इमारतीमध्ये निवडणूक विभागाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. तर दुसऱया मजल्यावर कार्यालय सुरू करण्यात आले असून संगणक ऑपरेटरसह सर्वच कामकाज या ठिकाणी चालणार आहे. त्यामुळे मतदारयादी किंवा मतदान ओळखपत्र यासंदर्भातील कोणत्याही कामासाठी नागरिकांना मुख्य कार्यालयाकडे धाव घ्यावी लागणार आहे. पण सदर कार्यालय दुसऱया मजल्यावर असल्याने वृद्ध मतदारांना अडचण निर्माण होण्याची शक्मयता आहे.