अभ्यासाच्या तक्रारीमुळे शाळेतून काढण्यात आलेल्या दोन विद्यार्थ्यांनी फास्टफूड कंपनी सुरू करून 25 कोटी रुपयांची उलाढाल केल्याची ही कथा आहे. शाळेतून काढून टाकण्यात आलेले परमवीर सिंग आणि रजत यांची 2013 मध्ये एका शिकवणी केंद्रावर गाठ पडली. हे दोघेही शिकवणी संपल्यानंतर बाजारात बर्गर खाण्यासाठी जात असत. असेच एक दिवस बर्गर खात असताना आपण त्यांचीच निर्मिती का करू नये, असा विचार दोघांच्याही मनात आला.
तो त्यांनी त्वरित अंमलात आणण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी बर्गरच्या बाजारपेठेचा अभ्यास सुरू केला. या फास्टफूडला मोठी मागणी आहे, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी जयपूरपासून दिल्लीपर्यंतच्या मोठमोठय़ा मल्टीनॅशनल ब्रँडच्या बर्गर्सचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी आपल्या घरातच समोरच्या खोलीत पहिल्या बर्गर आऊटलेटचा शुभारंभ केला.
आज आठ वर्षांनंतर त्यांनी स्वतःचाच एक बर्गर ब्रँड तयार केला आहे. अनेक प्रयोग करून त्यांनी भिन्न भिन्न चवींची आणि वेगवेगळय़ा पदार्थांची बर्गर्स तयार करण्यात यश मिळविले आहे. प्रारंभी त्यांच्याकडे कोणीही कर्मचारी नव्हता. घरात त्यांचे आईवडीलच या व्यवसायाचे व्यवस्थापन करीत असत. तथापि, आज त्यांच्याकडे 200 हून अधिक कर्मचारी आहेत. जयपूर, दिल्ली इत्यादी शहरांमध्ये त्यांची अनेक आऊटलेट्स आहेत. 500 पासून हजार बर्गर्सच्या ऑर्डरीही त्यांच्याकडे येत असतात. खास भारतीय स्वादाची त्यांची बर्गर्स सर्वत्र लोकप्रिय आहेत. अवघ्या 7 लाखांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेली ही कंपनी आता 25 कोटी रुपयांची उलाढाल प्रतिवर्ष करीत आहे.