अन्यथा आंदोलन करण्याचा शिंदोळी ग्रा. पं.चा इशारा : तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर-रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांच्या दुरुस्ती संदर्भात शिंदोळी ग्राम पंचायतीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
गेली चार वर्षे राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम रखडलेले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱया शिंदोळी, गुंजी, कापोली, मोहिशेत, लोंढा, रामनगर ग्रा. पं. च्या व्याप्तीत येणाऱया शंभर खेडय़ातील नागरिकांना शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर कामासाठी खानापूर येथे दररोज यावे लागते. सदर महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले असून रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. मागच्या वषी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली होती. यावषी झालेला मुसळधार पाऊस आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था गंभीर बनली आहे. रस्त्याच्या ठेकेदाराला लवकरात लवकर खड्डे बुजवायला लावून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा. तसेच येत्या आठ दिवसात रस्ता दुरुस्त झाला नाही तर खड्डे पडलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना देण्यात आला.
यावेळी ग्रा. पं. चे अध्यक्ष राजेश पाटील, सदस्य शंकर गावडा, तालुका ग्राम पंचायत असोसिएशनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, म. ए. समितीचे नेते यशवंत बिरजे, तिवोली ग्रा. पं. सदस्य सहदेव हेब्बाळकर, प्राध्यापक महांतेश पाटील, तानाजी गोरल, प्रशांत काजुणेकर, मनोज पाटील, नारायण पाटील, यशवंत शेलार, रामा गावडे यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्या कंत्राटदाराने रस्ता त्वरित दुरुस्त करावा…
गेली चार वर्षे हा रस्ता अशाच स्वरुपाचा असून शंभर खेडय़ांचा संपर्काचा रस्ता असतानासुद्धा या रस्त्याला कुणी वालीच नसल्याचे स्पष्ट होत आहे. या भागाचे खासदार अनंतकुमार हेगडे, आमदार अंजली निंबाळकर यांनी याबाबत साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. आता या रस्त्याचे कंत्राट नव्या कंत्राटदाराला मिळाले असून त्यांनी तात्काळ रस्ता वाहतुकीस योग्य करावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल.
– शंकर गावडा, शिंदोळी ग्रा. पं. सदस्य