आचरा / प्रतिनिधी
माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्याकडून आचरा बंधाऱ्याची पाहणी
बंधऱ्याच्या नादुरुस्त झडपांमुळे शेतजमीन होतेय बाधित
आचरा गाऊडवाडी, काझीवाडा, भंडारवाडी व डोंगरेवाडी भागातील खाजनसदृश्य भागाच्या खार बंधाऱ्याची झडपे तुटून पडल्याने खाडीचे खारे पाणी भातशेती जमीन भागात घुसल्याने सुमारे शेकडो एकर शेतजमीन ही खाऱ्या पाण्यामुळे बाधित झाली असून नापिक झाली आहे याबाबतचे बातमी तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेत माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी प्रत्यक्ष बंधाऱ्यावर जात पाहणी करत उपस्थित असलेल्या खारभूमी व विकास विभागाचे सहाय्यक अभियंता स्वप्नील होडावडेकर यांना नादुरुस्त झडपे तात्काळ दुरुस्त करण्यासाच्या सूचना दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत राजन गांवकर, अशोक सावंत, बाबा परब, धोंडी चिंदरकर, जेरॉन फर्नांडीस, जगदीश पांगे, दीपक सुर्वे, विजय कदम स्थानिक ग्रामस्थ सुरेश गांवकर, बबलू गांवकर, दीपक बिनसाळे उपस्थित होते.
आचरा गाऊडवाडी, काझीवाडा, भंडारवाडी व डोंगरेवाडी खाजनसदृश भागाच्या खार बंधारा असून यावर बसवलेली झडपे मोडून पडल्याने भरतीच्या वेळी पाणी घुसून मोठ्या प्रमाणात शेतजमीनत साठून राहिले आहे. त्यामुळे भातशेतीवरही ग्रामस्थांना पाणी सोडावे लागले आहे. जवळ जवळ २०० ते ३०० माड या खाऱ्या पाण्यामुळे नष्ट झाले आहेत. उर्वरित माडबागायतही धोक्यात असून विहिरीचे पाणी दुषित होण्याच्या मार्गावर आहे. आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले पिण्याचे पाणी दूषित झाले तर स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी दाखल होत पूर्ण बांधाऱ्याची पायी चालत जात पाहणी केली. यावेळी तुटलेल्या झडपाच्या ठिकाणी जात दुरावस्था झालेली झडपे तात्काळ सुस्थितीत करून देण्याची सुचना त्यांनी उपस्थित अधिकारी यांना केली. यावेळी उपस्थित अधिकारी होडावाडेकर यांनी झडपांची दुरुस्ती तात्काळ करून घेणार असल्याचे सांगितले.