शहरातील स्मार्ट रस्त्यांवरील फूटपाथवर विक्रेत्यांचे ठाण, अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची होतेय गैरसोय : वाहतूक कोंडीत भर
बेळगाव : शहरातील स्मार्ट रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. किरकोळ विक्रेते रस्त्यावर आणि फूटपाथवर बसत असल्याने पादचारी आणि वाहनधारकांची मोठी गोची होऊ लागली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोरील रस्त्यावर विक्रेत्यांचा विळखा पडल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. याकडे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या बसस्थानक परिसरात किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण होऊ लागले आहे. फूटपाथ सोडून प्रवासी रस्त्यावरून पायपीट करू लागले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात घडत आहेत. शिवाय प्रवासी रस्त्यावर आणि विक्रेते फूटपाथवर असे चित्रही पहावयास मिळत आहे. त्यामुळे फूटपाथ कोणासाठी आहेत? विक्रेत्यांसाठी की पादचाऱ्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे. बेकायदेशीर व्यवसाय थाटलेल्या विक्रेत्यांना हटवून फूटपाथ मोकळे करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. शहरातील फोर्ट रोड, मध्यवर्ती बसस्थानक, एपीएमसी रोड, आंबेडकर रोड, काकतीवेस, जेएनएमसी, रेल्वेस्टेशन, हेमू कलानी चौक, सिव्हिल हॉस्पिटल आदी ठिकाणी असलेल्या फूटपाथवर विक्रेत्यांचा विळखा वाढला आहे. याठिकाणी भाजीपाला, चहागाडा, फळे, थंडपेय आणि फूल विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पादचारी रस्त्यावरून ये-जा करू लागले आहेत. परिणामी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
लहान रस्त्यांवरदेखील बेकायदेशीर विक्रेत्यांची संख्या वाढली
विशेषत: वाढत्या उन्हामुळे फूटपाथवर उसाचा रस, फळांचे ज्यूस आणि थंडपेय विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. लहान रस्त्यांवरदेखील बेकायदेशीर विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचे तीनतेरा झाले आहेत. फूटपाथवर किरकोळ विक्रेत्यांची संख्या वाढू लागल्याने पायी चालणाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करणार
शहरातील फूटपाथ मोकळे करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र पुन्हा फूटपाथवर व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. लवकरच अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार आहे.
– रुद्रेश घाळी (मनपा आयुक्त)