निपाणी नगरपालिका इंग्रजी शाळेतील प्रकार : पालकांची शाळेकडे धाव
प्रतिनिधी / निपाणी
गोरगरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी निपाणी नगरपालिकेतर्फे पाच वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी शिक्षक व इतर पदांची भरती करून शाळेचे काम सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येकवर्षी या शाळेत प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडत आहे. अशावेळी आठवड्यापूर्वी अचानकपणे येथील मुख्याध्यापिकेसह शाळेतील काही शिक्षिकांनी राजीनामा दिला आहे. पण आता शाळा सुरू झाल्याने प्रवेशासह इतर कामांसाठी पालकांची गर्दी होत असताना मुख्याध्यापिकाच नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. याची माहिती मिळताच नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी व इतर अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन या पुढील काळातही शाळेचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहणार असल्याचे पालकांना सांगितले. मुख्याध्यापिकेला इतर ठिकाणी नोकरी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून त्या संबंधित ठिकाणी रुजू झाल्या असल्याचे समजते. त्यांच्याबरोबरच काही शिक्षकांनीही राजीनामा दिला आहे. परिणामी मुख्याध्यापिकेच्या जागेसह काही शिक्षिकांच्या जागा रिक्त आहेत.त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच पदे रिक्त झाल्याने पालकांची तारांबळ उडाली आहे. याशिवाय नवीन प्रवेश घेणे व इतर कामे प्रलंबित राहत आहेत. याबाबत पालकांच्या तक्रारी होताच गुरुवारी पालिका आयुक्तांसह काही अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली.
यावेळी पालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी म्हणाले, राजीनामा देणाऱ्या शिक्षिकांनी महिन्याअगोदर राजीनामा देणार असल्याचे सांगणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे न करता आठवड्यापूर्वी राजीनामा आपल्याकडे पाठवला आहे. त्यावर विचार सुरू असून याबाबत आपण गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांच्याशी संपर्क साधला आहे. सध्या या ठिकाणी मुख्याध्यापकांची नियुक्ती केली असून उर्वरित शिक्षक शुक्रवारपासून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पालकांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम न बाळगता आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. उर्वरित शैक्षणिक सत्र नेहमीप्रमाणे सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी नगरपालिकेतील अधिकारी नागेंद्र बहादुरी, स्वानंद तोडकर, बाबासाहेब खांबे, मारुती घाटगे यांच्यासह अधिकारी, पालक उपस्थित होते.
शाळेलाही राजकारणाची लागण?
नगरपालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळेतही राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढल्याची चर्चा सुरू आहे. आपल्याच मर्जीतील कर्मचाऱ्यांना येथे भरती करून घेणे, विद्यार्थी प्रवेशावेळी वशिलेबाजीचा शिरकाव यातून तज्ञ शिक्षक तसेच हुशार विद्यार्थी व गरीब पालकांच्यावर अन्याय होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गोरगरिबांसाठी शिक्षणाचे चांगले माध्यम बनलेली ही शाळा राजकारणाचा अ•ा बनू नये, हीच अपेक्षा सामान्य पालक वर्गातून व्यक्त होत आहे.