हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. मात्र प्रजासत्ताक दिन किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाल्यानंतर प्लास्टिकचे ध्वज कचऱ्यामध्ये किंवा रस्त्यावर फेकले जातात. ही बाब अत्यंत गंभीर आहे. एकप्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे. तेंव्हा त्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृतीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रध्वजाची विटंबना होवू नये यासाठी हिंदू जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी झाली होती. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा असे शासनाला तसेच केंद्रीय गृह विभागाला आदेशही दिले होते. तरीदेखील प्लास्टिकचे ध्वजविक्री केले जात आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा तातडीने प्लास्टिक ध्वजावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोनामुळे मास्क विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र हे मास्कदेखील तिरंगा ध्वजाच्या रंगामधील आहेत. ते वापरणे देखील चुकीचे आहे. एकप्रकारे तिरंग्याचा हा अवमान आहे. तेंव्हा त्याबाबतही विचार करावा आणि जनजागृती करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली. राष्ट्रध्वजासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मात्र 26 जानेवारीनंतर प्लास्टिकचे ध्वज कचऱ्याच्या कुंडामध्ये टाकले जात आहेत. ते थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुधीर हेरेकर, मधुकर होनगेकर, काशिनाथ शेट्टी, मिलन पवार, अक्काताई सुतार, सदानंद मासेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.