शिक्षण खात्याने दिले शाळांना निर्देश : बिलाचे पैसे मिळणार नसल्याचा इशारा : तरूण भारत इफेक्ट
प्रतिनिधी /मडगाव
स्वयंसहाय्य गटांकडून शालेय विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारा माध्यान्ह आहार यापुढे चांगल्या दर्जाचा असला तरच तो स्वीकारावा अन्यथा तसाच परत करावा. तसेच जोपर्यंत शाळेतील शिक्षक व पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी माध्यान्ह आहाराच्या बिलावर सही करीत नाही तोपर्यंत त्यांना बिलाचे पैसे मिळणार नसल्याचेही भाग शिक्षणाधिकाऱयांनी शाळांच्या प्रमुखांना कळविले आहे.
फोंडा तालुक्यातील काही शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा माध्यान्ह आहार विद्यार्थ्यांना पुरविला जात असल्याचे वृत्त दै. तरूण भारतमध्ये प्रसिद्ध होताच, संपूर्ण गोव्यात खळबळ माजली. निकृष्ट दर्जाचा माध्यान्स आहार पुरविणाऱया स्वयंसहाय्य गटांचे धाबे दणाणले. स्वयंसहाय्य गट प्रमुखांनी तरूण भारतशी संपर्क साधून आम्ही चांगल्या दर्जाचा आहार पुरवित असल्याचा दावा केला.
… तर आहार परत करावा
फोंडा तालुक्यातील भाग शिक्षणाधिकाऱयांनी निकृष्ट दर्जाचा माध्यान्ह आहार शाळांनी स्वीकारूच नये असा संदेश सर्व शाळांच्या प्रमुखांना दिला आहे. माध्यान्ह आहाराची चव, दर्जा पाहण्यासाठी ज्या शिक्षकाची नेमणूक केली आहे, त्याने अगोदर माध्यान्ह आहाराची चाचणी करून पहावी. जर आहार निकृष्ट दर्जाचा असेल तर तो तसाच परत करावा. तो विद्यार्थ्यांना खायला देऊ नये. आहाराच्या दर्जाकडे तसेच प्रमाणाकडे कोणतीच तडजोड करू नये असे स्पष्टपणे कळविण्यात आले आहे.
आहाराचा दर परवडत नाही
शिक्षण खात्याकडून देण्यात येणारा 6 रूपये 11 पैसे हा दर परवडत नसल्याचे सांगितले. आम्ही पहाटे 4 वाजता उठून माध्यान्ह आहाराच्या तयारीला लागतो. पण, जो दर दिला जातो तो परवडत नाही. दर वाढवून मिळावा यासाठी आम्ही राजकीय व्यक्तीची भेट घेतली. पण, त्यांच्याकडून केवळ आश्वासनच मिळाल्याचे सांगण्यात आले.
स्वयंसहाय गटांची धावपळ
निकृष्ट दर्जाच्या माध्यान्ह आहाराचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आहाराचा दर्जा राखावा असा आदेश सर्व स्वयंसहाय्य गटांपर्यंत पोचला. त्यामुळे सर्वांची धावपळ सुरू झाली. अनेक भाग शिक्षणाधिकाऱयांनी आपआपल्या भागातील स्वयंसहाय्य गटांकडे संपर्क साधून त्यांना सतर्क केले.
पालक, शिक्षकांच्या प्रतिक्रिया
अनेक पालकांनी तसेच जागृत नागरिकांनी व शिक्षकांनी देखील या वृत्ताची दखल घेत विद्यार्थ्यांच्या जीवाकडे हा खेळ मांडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माध्यान्ह आहाराचे कंत्राट मिळविण्यासाठी जी धडपड केली जाते, त्याच पद्धतीने तो चांगल्या दर्जाचा देण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे, असे मत मांडले. जर स्वयंसहाय्य गटांना दर परवडत नसेल तर ते कंत्राट मिळविण्यासाठी कशाला धडपड करतात, असा सवाल उपस्थित करण्यात आला. शिवाय दर परवडत नसल्यास त्यांनी आपली कैफियत योग्य व्यासपीठावर मांडावी, हा पर्यायही त्यांच्या आहे असे मत व्यक्त करण्यात आले.
मुख्यमंत्री स्वतः लक्ष देतात योजनेकडे
विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱया माध्यान्ह आहाराकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः लक्ष ठेऊन आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा आहार मिळावा व त्यात कोणतीच तडजोड करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे बजावले असल्याचे भाग शिक्षणाधिकाऱयांनी शाळा प्रमुखांना कळविले आहे.