पुणे / प्रतिनिधी :
Returning Monsoon will withdraw from Maharashtra soon परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील काही भागांतून माघार घेतली असून, पुढच्या तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागातून तो माघारी फिरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागच्या आठ दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने धूमाकूळ घातला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह सर्वदूर पावसाचा धूमधडाका सुरू आहे. त्यामुळे परतीच्या पावसाची माघारीची तारीख पुढे गेली आहे. राजस्थानातून झालेला परतीच्या पावसाचा प्रवास अद्याप सुरू असल्याचे दिसत आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरातमधील उर्वरित भागांतून व मध्य प्रदेशातील बहुतांश भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड व महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. माघारीची रेषा डाल्टनगंज, पेंद्र रोड, छिंदवाडा, जळगाव, डहाणू येथे आहे. येत्या तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मान्सून माघारी फिरेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पावसाचा मुक्काम लवकरच संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अधिक वाचा : चेन्नई-बेंगळूर-म्हैसूर मार्गावर धावणार पाचवी वंदे भारत ट्रेन
यंदा परतीच्या पावसाच्या दणक्याने शेतीवर अस्मानी संकट कोसळले. अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने मोठय़ा प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर शहरातील जनजीवनही विस्कळित झाले. त्यामुळे पाऊस कधी निरोप घेणार, याकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत. हे पाहता पाऊस कधी अलविदा करणार, याबाबत उत्सुकता आहे.
पुणे तुंबले
पुण्यात शनिवारी पावसाने दाणादाण उडविली. दुपारपासून कोसळणाऱ्या या पावसाने शहराचे जनजीवन विस्कळित झाले. अनेक रस्ते जलमय होण्यासह वेगवेगळय़ा भागांत पाणी साचल्याचे दृश्य ठिकठिकाणी दिसत होते. ओसंडून वाहणाऱ्या या पाण्यातूनच चालक गाडय़ा हाकत असल्याचे चित्र पहायला मिळाले.