प्रतिनिधी/ बेळगाव
मागील सहा महिन्यांपासून लम्पीमुळे बंद असलेला जनावरांचा बाजार शनिवारी पूर्ववतपणे भरला. एपीएमसी येथील जनावरांच्या मुख्य बाजारातच हा आठवडी बाजार भरला. त्यामुळे दलाली विक्रेते आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून ओस पडलेला जनावरांचा बाजार शनिवारी बहरल्याचे पहायला मिळाले.
अडचणीत सापडलेल्यांना दिलासा
जिल्ह्यात सप्टेंबर दरम्यान लम्पीचा शिरकाव झाला होता. दरम्यान जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून एपीएमसी येथील जनावरांचा बाजार बंद होता. मागील महिन्याभरापासून केवळ एपीएमसी प्रवेशद्वारावर बाजार भरून किरकोळ खरेदी विक्री सुरु होती. दरम्यान प्रशासनाने जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. शनिवारी एपीएमसीमध्ये पूर्ववतपणे जनावरांचा बाजार भरला. विक्रीसाठी गायी, म्हशी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या विक्रेते व्यापारी आणि दलालांना काही दिलासा मिळाला आहे.
पुढील आठवड्यात जनावरांची संख्या वाढण्याची शक्यता
एपीएमसी येथे भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र मागील काही दिवसांपासून बाजार बंद राहिल्याने उलाढालही थांबली होती. दरम्यान व्यापारी, दलाल अडचणीत आले होते. शिवाय शेतकऱ्यांची देखील जनावरांची खरेदी-विक्री थांबली होती. त्यामुळे नवीन जनावर खरेदीपासून वंचित रहावे लागले होते. मात्र आता पूर्ववतपणे जनावरांचा बाजार एपीएमसीत सुरू झाला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात जनावरांची संख्या वाढेल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.
लम्पीमुळे बाजारावर मोठा परिणाम
एपीएमसी येथील जनावरांच्या बाजारात गायी, म्हशी आणि बैलजोड्या विक्रीसाठी येतात. शिवाय संकरित जातीचे जनावरे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांची वर्दळ देखील अधिक असते. त्यामुळे दर शनिवारी जनावरांचा बाजार गजबजतो. मात्र मागील दोन वर्षात कोरोना आणि लम्पीमुळे जनावरांच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. आता जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एपीएमसीत जनावराच्या बाजाराला पूर्ववतपणे सुरुवात झाली आहे.