प्राधिकरणाकडे नोंदविला तीव्र आक्षेप : रिंगरोडविरोधात शेतकरी एकवटले; निर्णयावर ठाम
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्यातील 31 गावांतील शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी रिंगरोडसाठी भूसंपादन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मांडण्याबाबत सुनावणी झाली. दरम्यान, शेतकऱ्यांनी रिंगरोडला तीव्र विरोध केला आहे. शिवाय आमची पिकाऊ जमीन कदापिही देणार नाही, असे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्यासमोर ठणकावून सांगितले आहे. तालुक्यातील विविध गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी रिंगरोडसाठी संपादित केल्या जाणार आहेत. त्यामुळे हा रिंगरोड शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. तिबार पिके घेणारी सुपीक जमीन या रोडसाठी जाणार असल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. दरम्यान, ही जमीन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी आंदोलने छेडण्यात येत आहेत. शिवाय कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, या निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. शिवाय याठिकाणी आपला विरोध तीव्रपणे दाखविला आहे. जमीन गेल्यानंतर आपण रस्त्यावर येऊ, त्यामुळे जमीन देणार नाही, असा निर्धार केला आहे. बेळगाव, आंबेवाडी, बाची, बिजगर्णी, गोजगा, होनगा, कडोली, काकती, कल्लेहोळ, संतिबस्तवाड अशा 31 गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या रिंगरोडविरोधात सर्व शेतकरी एकवटले असून रिंगरोड होऊ देणार नाही, या निर्णयावर ठाम आहेत.
आज कल्लेहोळ गावच्या शेतकऱ्यांची सुनावणी
रिंगरोडसाठी जमीन जाणाऱ्या कल्लेहोळ येथील शेतकऱ्यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे शुक्रवार दि. 26 रोजी सुनावणी होणार आहे. शेतकरी आपले म्हणणे यावेळी मांडणार आहेत.