प्रतिनिधी/ सातारा शहर
यंदाचा पावसाळा लांबला आणि परतीच्या पावसनेही कहर केला, त्यामुळे शहरातील ठिकठिकाणच्या मोकळ्या जागेत ओढय़ाच्याकडेने मोठय़ा प्रमाणात झाडी व गवत वाढले आहे. सभोवताली राहणाऱया नागरिकांना डासांचा मोठा त्रास होत असल्याने वाढलेली झाडी काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सातारा शहरातील गुरुवार पेठ, कोतवाल वाडा परिसरात मोठय़ा प्रमाणात गवत आणि झाडी वाढलेली आहे. या परिसरातून जाणाऱया नैसर्गिक ओढय़ाच्या दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणात झाडी वाढल्याने परिसरात राहणाऱया नागरिकांना डासांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डासांमुळे होणाऱया डेंगू, मलेरिया सारख्या आजारांने परिसरातील अबाल वृद्ध बाधित होत असून अनेकांना उपचारासाठी पुण्याला ही जावे लागले आहे.
या संपूर्ण प्रभागातील मोकळ्या जागेत यात एलबीएस कॉलेज परिसर, चांभारवाडा, आर के बॅटरी मागील भाग, या भागाचा समावेश आहे. त्या ठिकाणी नगरपालिकेकडून त्वरित झाडी काढून परिसर स्वच्छ करुन डास मुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या नगरपरिषदेवर प्रशासक असल्याने नागरिकांनी हे काम प्रशासकांनी त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.