पाणी नसल्याने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय : आणखी पाऊस लांबल्यास चिंतेत भर पडण्याची शक्यता
वार्ताहर / किणये
दि. 8 जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. तरीही तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाली नाही. यामुळे शेत शिवारातील खरीप हंगामाची कामे खोळंबली आहेत. गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील नदी-नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाऊस वेळेत दाखल न झाल्यास पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता आहे.
यंदा तालुक्यात वळीव पावसाने हुलकावणी दिली. यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे लांबणीवर पडली. गेल्या आठ दिवसापासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये धुळवाफ पेरणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र मृग नक्षत्राला सुरुवात होऊनही पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याने बेळगाव परिसरातही पाऊस दाखल होणार असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र पाऊस झाला नाही यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत.
विहिरी, कूपनलिका यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे खरीप हंगामासाठी शेतकरी शिवारात मशागतीची कामे करू लागला आहे. मात्र मान्सून दाखल झाल्यानंतरच शेतीच्या कामाला जोर येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.