पंचायतीचे दुर्लक्ष, नागरिकांत नाराजी
वार्ताहर /गुंजी
गुंजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कामतगा येथे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जलजीवन योजनेतून घरोघरी नळजोडणीचे काम हाती घेण्यात आले होते. गावात प्रत्येक घरी नळाद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या गावातील सर्व गल्लीमधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची जेसीबीद्वारे खोदाई करण्यात आली होती व त्यातून या योजनेसाठी पाईपलाईन घालण्यात आली होती. मात्र सदर पाईपलाईनसाठी मारलेल्या चरी बुजवून पुन्हा रस्ता जैसे थे करण्याची गरज होती. मात्र हे काम करत असताना सदर कंत्राटदाराने त्यामध्ये माती टाकून चरी अर्धवट बुजवून काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांच्या मधोमध गटारी निर्माण झाली असून येथील नागरिकांना ये-जा करत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय रात्रीच्या वेळी लहान मुलांना व नवख्या वाहनधारकांना याचा फटका बसत आहे. याविषयी येथील ग्राम पंचायत सदस्य हणमंत जोशीलकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे सांगून हे काम पूर्ण होताच चरी बुजवण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना सांगितले. मात्र गेल्या पावसाळ्यापासून खोदाई करण्यात आलेले रस्ते जवळजवळ सहा महिने लोटले तरी तशाच धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी संबंधितांनी याची दखल घेऊन सदर रस्त्यावरती काँक्रिटीकरण करून रस्ते वाहतुकीसाठी सुलभ करावे, अशी आग्रही मागणी नागरिकांतून होत आहे.