अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 18 ऑगस्ट 21, सकाळी 11.00
● उशीरा अहवाल आल्याने उपचाराबाबत संभ्रम ● अहवाल येईपर्यंत एकाचे होतात पाच रूग्ण ● जिल्ह्यात गेल्या 24 तासात वाढले 652 रूग्ण ● 14765 संशयितांच्या चाचण्या ●सातारा, फलटण, कराड, खटावला स्वतंत्र नियोजन गरजेचे
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात गेल्या चार दिवसात कोरोना रूग्णवाढीच्या पॉझिटिव्हीटी रेटमधे दररोज एक ते दीड टक्क्याने वाढ होत आहे. पॉझिटीव्हीटी रेट वाढत असतानाच गेल्या 24 तासात जिल्ह्यात नव्या 652 रूग्णांची भर पडली आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात 62 हजार 303 संशयित रूग्णांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 3517 रूग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. चाचण्या आणि त्यांचे अहवाल येण्यात खूप वेळ वाया जात असल्याच्या तक्रारी पुन्हा वाढल्या आहेत. विशेषतः आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल ‘मिसिंंग’ दाखवणे किंवा चार ते पाच दिवसांनी मिळणे रूग्णांचा जीव टांगणीला लावणारे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरात आता गर्दी वाढली असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन आरटीपीसीआर अहवाल मिळण्याच्या नियोजनात सुसुत्रता आणण्याची मागणी वाढली आहे.
अहवाल उशीरा आल्याने उपचाराला वेळ
जिल्ह्यातील लॉकडाऊन 15 ऑगस्टपासून उठला असून 13 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 62 हजार 303 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. यामधे पॉझिटिव्ह 3517 रूग्ण आढळले आहेत. मात्र आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल उशीरा येणे किंवा मिसिंग होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आरटीपीसीआर टेस्ट अचूक असल्याने अनेकांचा त्या अहवालावर शक्यतो भर असतो. त्यामुळे या चाचण्यांचे अहवाल वेळेत येण्यासाठी नियोजन होण्याची मागणी होत आहे. आरटीपीसीआर अहवाल वेळेत न आल्याने अनेक रूग्णांना भितीपोटी एचआरसीटी तपासणी करावी लागत आहे. त्याआधारे उपचाराची सुरूवात करावी लागत आहे.
विनामास्क कारवाईत ढिलाई
लॉकडाऊन उठल्याने सातारा, कराड, फलटण वाई, महाबळेश्वर, कोरेगांव शहरात गर्दी वाढली आहे. कराड शहरात आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांचीही ये-जा वाढली आहे. यातच गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अपवाद वगळता बंद झाला आहे. मास्क गळ्यात किंवा हातात लटकवत गर्दीत वावरणारांची संख्या प्रचंड आहे. प्रशासनानेही मास्क न वापरणारांवरील कारवाईकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कराडसारख्या शहरात गर्दीच्या ठिकाणी ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग अशी स्थिती आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 16,02,006 एकूण बाधित 2,31648 एकूण कोरोनामुक्त 2,18,361 मृत्यू 5,630 उपचारार्थ रुग्ण 10,878
मंगळवारी जिल्हय़ात बाधित 652 मुक्त 783 बळी 27