ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडत आहेत. धार्मिक दंगल मर्यादित भागात झाली असेल तर फार चिंतेचा विषय नाही. मात्र असे प्रकार घडत नसून, ते जाणीवपूर्वक घडवले जातात. त्यांना सत्ताधाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळते, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
संभाजीनगरमध्ये आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यात होणाऱ्या धार्मिक दंगलींवर भाष्य केलं. ते म्हणाले, संभाजीनगर, कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी धार्मिक दंगल झाली. या दंगली मर्यादीत भागात झाल्या. तर हा फार चिंतेचा विषय नाही. मात्र असे प्रकार घडत नसून, ते जाणीवपूर्वक घडवले जातात. मी काल एका वाहिनीवर पाहिलं की, गर्दीत कोणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवत आहे. आता या गोष्टीसाठी इतर ठिकाणी दंगल करायचं काय कारण आहे, यासाठी पुण्यात आंदोलन करायची काय गरज आहे? असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी, अशी परिस्थिती सध्या देशात आहे. व्यक्तिगत कारणातून समाज आणि चर्चवर हल्ला करणे चूक आहे. मुस्लिम समाजात चार-दोन चुका होऊ शकतात, तशा गोष्टी हिंदूंकडूनही होऊ शकतात. समाज एकसंघ ठेवायचा असेल तर जातीपातींमधील भेदभाव टाळला पाहिजे. द्वेषाच्या विरोधात समाजाने उभं राहिलं पाहिजे, असेही पवार म्हणाले.