सीमाप्रश्नी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा एकमुखी निर्धार
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने बुधवारी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. 1969 मध्ये मुंबई येथे झालेल्या आंदोलनात शिवसेनेने सीमाप्रश्नासाठी 67 हुतात्मे दिले. या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सम्राट अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर व मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी बोलताना तालुका म. ए. समितीचे मनोज पावशे म्हणाले, मराठी भाषा, संस्कृती टिकावी या उद्देशाने लढा सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईसोबतच न्यायालयीन लढा सुरू असला तरी अद्याप न्याय मिळालेला नाही. जोवर न्याय मिळत नाही तोवर लढा सुरूच राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
माजी महापौर सरिता पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. खानापूर म. ए. समितीचे मुरलीधर पाटील यांनी मतभेद बाजूला ठेवत एकीने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून लोकशाही पायदळी तुडविली जात असल्याचे सांगितले. प्रकाश शिरोळकर व मालोजी अष्टेकर म्हणाले, हुतात्म्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे सांगितले. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, शांता मेलगे, रामचंद्र मंडोळकर, यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, प्रकाश हेब्बाजी, विनायक कोवाडकर, अंकुश केसरकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, प्रकाश नेसरकर यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पिरनवाडी येथील कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधण्यात आले.
शिवसेनेच्यावतीने अभिवादन
शिवसेनेच्यावतीने बुधवारी सम्राट अशोक चौक येथे अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, प्रदीप सुतार, चेतन शिरोळकर, विनायक जाधव, विठ्ठल हुंदरे, मतेश आयप्पगोळ, नितेश केरवाडकर, सचिन रेमाण्णाचे, संजय देसाई, विजय थोरवत यासह इतर उपस्थित होते.