ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेने आज दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधण्यासाठी बोलावले होते. मात्र, संभाजीराजे शिवसेनेच्या निमंत्रणाकडे पाठ फिरवून पहाटेच कोल्हापूरला रवाना झाले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणूनच उमेदवारी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे या जागेसाठी रस्सीखेच सुरू असून, संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची हाक दिली आहे. त्यामुळे या जागेचा तिढा आणखी वाढला आहे. इतर पक्षांकडून पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा संभाजीराजे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र शिवसेनेत प्रवेश केला तरच त्यांना उमेदवारी देता येईल अशी अट शिवसेनेने घातली होती. शिवसेनच्या तीन नेत्यांच्या शिष्टमंडळाने काल संभाजीराजे यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर तासाभरातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याकरवी संभाजीराजेंना शिवबंधन बांधायला आज दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर या असा निरोप दिला होता. संभाजीराजेही दुपारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. त्यामुळे राज्यसभेच्या खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली होती. परंतु संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या निमंत्रण पाठ फिरवली असून, ते पहाटेच कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करा, अशी मागणी संभजीराजेंनी केल्याची माहिती होती. त्यानंतर मराठा मोर्चा समन्वयकांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी पवार यांच्याकडे त्यांनी केली होती. दरम्यान, संभाजीराजे यांच्याकडून मात्र अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसून, ते अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम असल्याचे समजते.