केंद्रीय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल : मित्र पक्षांच्या विजयात भाजपचा वाटा : यापुढे मतदार संघात कोणतीही चूक होणार नाही : भाजपचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवणार
प्रतिनिधी/इस्लामपूर
लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी असून या अगोदर मित्र पक्षांना बरोबर घेवून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या विजयात भाजपचा वाटा आहे. सध्या कोणतेही पक्षासोबत युती करताना तो सोबत राहिल, याबाबत साशंकता निर्माण होते. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. महाराष्ट्रात उध्दव ठाकरे तर पंजाबमध्ये अकाली दलाने आमची साथ सोडली. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत कोणतीही चूक करणार नाही. यापुढे भाजपाचा विचार तळागाळात पोहचवण्यासाठी व हातकंणगले मतदार संघात भाजपला ताकद देणार असल्याची माहिती केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल यांनी पत्रकार बैठकीत दिली.
या पत्रकार बैठकीस खा. संजय पाटील, आ. गोपीचंद पडळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख यांची उपस्थिती होती. मंत्री बघेल म्हणाले, हातकंणगले मतदार संघात यापुर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व शिवसेनेचे खा. धयैशील माने निवडून आले होते. यांना निवडून आण्यात भाजपचा मोठा वाटा होता. त्यावेळी ते मित्र पक्ष म्हणून भाजप बरोबर होते. यापुढे या मतदार संघात भाजपला ताकद देणार आहे.
मंत्री बघेल पुढे म्हणाले, पश्चिम बंगाल मधील दोन मतदार संघ व महाराष्ट्रातील हातकंणगले लोकसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. हा मतदार संघ मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचल्या की नाहीत, याची पडताळणी करत आहे. त्याच बरोबर भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी बुथ कमिटी अध्यक्ष, कोअर कमिटी, युवा मोर्चा यांच्याबरोबर चर्चा व त्यांचे प्रश्न ऐकून घेवून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार संपवला.
हे ही वाचा : भाजप आमदार टी. राजा सिंह यांना अटक
उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या न्यायालयीन प्रकरणाच्या प्रश्नावर उत्तर देताना बघेल म्हणाले, कोणी कोणासोबत जावे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यावरील निर्णय न्यायालयीन बाब आहे. येत्या काही दिवसात तो ही प्रश्न सुटेल. हातकंणकले मतदार संघात विकासाच्या दृष्टीने कोणत्या कामांची गरज आहे. तसेच सांगली – पेठ रस्त्याच्या बाबतीत खासदारांना घेवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून लवकरच या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली.
अण्णासाहेब डांगे यांची भेट
केंद्रीय मंत्री बघेल म्हणाले, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे आमचे जुने मार्गदर्शक आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ते आमचे नेते होते. या भागात आलोय त्यांना न भेटणे हे गैर दिसतेय. त्यांची भेट ही सदिच्छ भेट आहे, याचा राजकीय अर्थ काढू नये असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : उध्दव ठाकरे गटाला दिलासा ; महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे!