नागरिक आयुक्तांवर भडकले : आप्पासाहेब पाटील नगरमध्ये रस्त्यांची दुरवस्था ; महापौरांनाही घेतले फैलावर
सांगली: ड्रेनेज, गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरी व्यवस्थित न मुजविल्याने शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील आप्पासाहेब पाटील नगरमध्ये दलदल निर्माण झाली आहे. दुचाकी घसरुन अपघात होत असल्याने संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी सोमवारी रात्री उशिरा थेट महापालिका आयुक्तांच्या शासकिय निवासस्थानावर धडक मारली. आयुक्त नितीन कापडणीस व आंदोलक नागरिकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. भडकलेल्या नागरिकांनी आयुक्तांच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. “समस्या सुटत नसतील तर बिस्तारा बांधा अन् चालते व्हा” अशा शब्दात आयुक्तांना सुनावत संतापाला वाट मोकळी करुन दिली.
नागरिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत आयुक्त निवास्थानावर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. तब्बल तासाभराच्या आंदोलनानंतर नागरिकांनी माघार घेतली. मंगळवारी सकाळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीतही नागरिकांनी महापौरांना फैलावर घेतले. महापौर सुर्यवंशी, उपायुक्त राहूल रोकडे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या उपस्थितीत आंदोलक नागरिकांची बैठक पार पडली. यामध्ये तातडीने सर्व अंतर्गत रस्त्यांचे मुरमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगरसेवक ठोकळे यांनी दिली.
आयुक्तांच्या निवासस्थानावर धडक
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये आप्पासाहेब पाटील नगरचा समावेश होतो. गॅस पाईपलाईन, ड्रेनेजसाठी परिसरातील रस्त्यांची चाळण करण्यात आली आहे. खोदलेल्या चरी व्यवस्थित मुजविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सर्वत्र दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत. दुचाकी घसरुन अपघात होत आहेत. याकडे महापालिका प्रशासन, नगरसेवकांचे लक्ष वेधूनही दखल घेतली जात नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याचा सोमवारी सायंकाळी स्फोट झाला. संतप्त नागरिकांनी सोमवारी रात्री उशिरा महापालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानावर धडक मारली.
हेही वाचा- Sangli; अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून प्रकरणी जन्मठेप
आयुक्त-नागरिकांच्यामध्ये बाचाबाची
तब्बल एक तास आंदोलक नागरिक आयुक्तांच्या निवासस्थानासमोर होते. मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी घोषणाबाजी सुरु केली. आयुक्त निवासस्थानामधून बाहेर आले. त्यांनीही आक्रमक होत आंदोलकांना सुनावले. आंदोलन करण्याचे हे ठिकाण आहे काय अशा शब्दात आयुक्तांनी नागरिकांना सुनावले. यामुळे वाद वाढतच गेला. नागरिक व आयुक्तांच्यामध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती लक्षात घेत पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र नागरिक आपल्या आंदोलनावर ठाम होते.
महापौर, उपायुक्तांच्या उपस्थितीत बैठक
अखेर पोलिसांनीच समजूत काढल्याने नागरिकांनी माघार घेतली. मंगळवारी सकाळी नागरिकांनी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांच्या दालनामध्ये गोंधळ घातला. महिला आंदोलक प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. महापौर सुर्यवंशी यांनाही त्यांनी धारेवर धरले. आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा पाढाच त्यांनी महापौरांसमोर वाचला. परिसरातील रस्ते तातडीने दुरुस्त करुन देण्याची मागणी केली. महापौर सुर्यवंशी, उपायुक्त राहूल रोकडे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे यांच्या उपस्थितीत नाग†िरकांची बैठक झाली. यामध्ये तातडीने अंतर्गत रस्ते मुरुम टाकून दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा- Sangli; जि.प.,पंचायत समिती आरक्षण सोडत स्थगित
आयुक्तांना जमत नसेल तर चालते व्हावे..!
आप्पासाहेब पाटील नगरमध्ये 250 घरे आहेत. 2019 पासून रस्ते, गटारींसह मूलभूत सोयीसुविधांसाठी पाठपुरावा सुरु आहे. मात्र दखल घेतली जात नाही. आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी सांगलीकरांचे संस्कार काढले. अशा आयुक्तांनी सांगलीला गरज नाही. त्यांच्या हातून समस्या सुटत नसतील तर त्यांनी बिस्तारा बांधावा अन् चालते व्हावे.
सुजाता पाटील, स्थानिक नागरिक.