महगाईने होरपळत असलेल्या जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
सांगली प्रतिनिधी
महागाईने जनता होरपळत असून वाढलेल्या महागाईपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तसेच जनतेची नाराजी लपविण्यासाठी भाजपने स्वतः करता येत नाही म्हणून काहींना बुजगावणे करून सध्या राज्यात राजकीय भोंगे वाजविण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जिह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.
इंधन, गॅस सिलिंडर दरवाढीसह महागाईत मोठी वाढ झाली आहे. महागाई रोखण्यात मोदी सरकारला अपयश आले असून मध्यम व गोरगरीब जनता महागाईत होरपळत आहे. संसार कसा चालवायचा? हा जनतेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर दमून-भागून आल्यानंतर पुढचा दिवस कसा काढयाचा, याची चिंता महागाईने सर्वसामान्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत जनतेचे लक्ष या महागाईवरून विचलित करण्यासाठी भाजपने काहींना पुढे करून राज्यात भेंगे वाजविण्याचे राजकीय काम सुरू केल्याचा आरोप राज ठाकरे यांचे नाव न घेता पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केला.
मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमवर बोलताना ते म्हणाले, भोंग्याचा आवाज किती असावा, याबाबत उच्च न्यायालयाने ठरवून दिले आहे. त्यापेक्षा अधिक आवाज असेल तर त्यावर कारवाई होईल. मग, तो कोणत्या धर्माचा आहे, ते बघण्याची गरज नाही. ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते. पण, आंदोलनाला जास्त कोण येतील, असे वाटत नाही, आंदोलनाने युवकांचे करिअर खराब होते. त्यामुळे युवक अशा आंदोलनाच्या चिथावणीला बळी पडणार नाहीत. त्यातूनही कोणी कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला तर पोलीस कादेशीर कारवाई करतील.
युती सरकार असताना भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू असल्याच्या भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, अशी कधीच चर्चा आपल्याबरोबर झाली नाही. शिवसेनेबराबेर सत्तेत असताना राष्ट्रवादीबरोबर करणे म्हणजे भाजपचे सहकाऱयाबरोबर गैरविश्वास दाखविण्यासारखे आहे. राष्ट्रवादीबद्दल आकर्षण किती होते. यावरून दिसून येते. असा खोच टोला यावेळी त्यांनी लगावला. राष्ट्रवादीला भाजप टार्गेट करीत असलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीची राज्यात मोठी शक्ती असून ताकद वाढत आहे. आम्हाला नामोहरम करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्यामुळेच सत्तेतवर आले. याचाही राग भाजपाला आहे. महविकास आघाडी सरकार पडणार या चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याची खिल्ली उडविताना जयंत पाटील म्हणाले, त्यांच्या अनेक तारखा झाल्या, आता त्यांना तारखा देणाऱया ज्योतिष्यांची चौकशीची गरज आहे.
…तर फडणवीसांनी खासगीत सांगावे
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण बाबरी मशिद पाडण्यासाठी गेलो होतो. या वक्तव्याबाबत जयंत पाटील म्हणाले, फडणवीस आणि माझी घट्ट मैत्री आहे. पण, त्यांनी बाबरीबाबत यापूर्वी असे कधीही सांगितले नाही. आज ते म्हणतात ते विश्वास बसण्यासारखे नाही. खरोखरच ते त्यावेळी तेथे होते. तर त्यांनी बाबरी मशिद कशी पाडली. त्यावेळी काय घडले, त्यांनी नेमके तेथे काय केले, ते त्यांनी खासगीत सांगावे, त्यांचा दावा असा असेल तर मग शिवसेना प्रमुखांनी त्याचवेळी जबाबदारी घेतली होती. मग, फडणवीस यांनी का घेतली नाही? असा सवालही यावेळी मंत्री पाटील यांनी केला.
राजकारणासाठी केंद्राची सुरक्षा
केंद्राकडून भाजप नेते आणि त्यांचे समर्थक असलेल्या पक्षाच्या नेत्यांना विशेष सुरक्षा पुरविली जात असल्याच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, दाऊदसारख्या गुन्हेगाराने फोन करून धमकी दिली तर संबधितांना सुरक्षा पुरविण्याची गरज आहे. मात्र, सध्या असे काहीही नसताना कोणालाही सुरक्षा देण्यात येत आहे. राजकारणासाठी गरज असल्याने त्यांना सुरक्षा देण्यात आल्याचा टोला गोपिचंद पडळकर यांचे नाव न घेता मंत्री पाटील यांनी लगावला. आपण साधे आहोत, त्यामुळे कधीही सुरक्षा मागितली नाही, त्याची गरजही भासली नसल्याचे सांगून त्यांनी पडळकर यांच्या सुरक्षेची खिल्ली नाव न घेता उडविली.