ऑनलाईन टीम/तरुण भारत
मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. नेते शिवसेना सोडून जात आहेत पण शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबर असल्याचे दिसून येत आहे. राज्यात शैवसिनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांचा निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना (Shivsena) नेते पुन्हा संघटनात्मक बंदी मजबूत करण्यासाठी मुंबईत ठीक ठिकाणी मळावे घेत आहेत. शिवसेनेचा आज दहिसरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी उपस्थित होते. या मेळाव्यात संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना बंडखोर आमदारांवर टीका केली. “तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या. पण एकातही ती हिंमत नाही.”, असे राऊत यावेळी म्हणाले.
“तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या”, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले. यावरूनही संजय राऊतांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. “शिवसेनेला एकच बाप आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे”, हे पळून गेले त्यांचे जवळपास २० ते २५ बाप आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.
“संजय राऊत कोणी नाही. पण शिवसेना या चार अक्षरांनी आम्हाला राष्ट्रीय नेता केले आहे. आज कुठेही जा बाळासाहेब ठाकरेंचा वाघ आहे तो शिवसेनेमुळे म्हणतात. आम्हाला पाहिल्यावर याच्या नादाला लागायला नको म्हणून मोदी आणि शाह रस्ता बदलतात. कोणाची हिंमत नाही आमच्या हाताला धरुन बाजूला खेचायची. हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे याच्या नादाला लागू नका म्हणतात. याच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडली तर झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“गुलाबराव पाटील मोठमोठी वक्तव्य करायचा. आता ढुंगणाला पाय लावून पळालाय. सांदीपन भुमरे, वॉचमन होता. याला वडा सांबार घेत येत नव्हता, जमिनीवर बसून वडा सांबार खात होता. आज कॅबिनेट मंत्री झाला. शिवसेनेमुळे मी झालो, म्हणून रडायला लागला, हे सगळे खोटे अश्रू होते. प्रकाश सुर्वे, भाजी विकत होता ना. पुन्हा भाजी विकतायला पाठवूया. महाराष्ट्राचा बिग बॉस आजही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत.”
“मुंबई केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव आहे म्हणून शिवसेना तोडायची आहे. शिवसेनेत यायचं, शिवसेनेचे संरक्षण घ्यायचे, प्रॉपर्ट्या करायच्या आणि त्याच पैशांनी शिवसेनेवर वार करायचे. उद्धव ठाकरेंना सांगितलंय, की ही घाण आता पुन्हा आपल्यात घेऊ नका. बाहेरुन येतात आणि आम्हाला शहाणपणा शिकवता? दिघे आम्हाला सांगू नका, गद्दारांना क्षमा नाही, हे दिघेंचं स्टेटमेन्ट मी लिहून घेतलेयं. तेव्हा हे कुठे होते अधर्मवीर. आता मर्सिडीज रिक्षा चालवतात. शिवसेनेला एकच बाप आहे, आणि कुणाला बाप चोरता येत नाही आणि ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे.”, असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.
“बाळासाहेबांनी वाढवली ती खरी शिवसेना आहे. सेना ही ५६ वर्षांची चिरतरुण आहे. अजिंक्य आहे. या सेनेला मरण नाही, असं राऊत म्हणाले. शंकराने हलाहल प्राशन करताना जे थेंब सांडले. त्यातून शिवसेना तयार झाली आहे. ज्या शिवसेनेने पहिली सत्ता ठाण्यात मिळवली. त्या ठाण्याच्या नेत्याने सूड उगवला आहे. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही. या मराठी माणसाच्या मनगटात हिंदुत्व आणि रक्तात शिवसेना आहे. ज्याने बाळासाहेबांशी गद्दारी केली. तो संपला. हिम्मत असेल तर राजीनामा द्या. निवडणुकीला समोर उभे राहा. मी चॅलेंज करतो”, असं राऊतांनी म्हटले.
“जर आपण महानगरपालिका प्रचंड बहुमताने जिंकलो तर गुवाहाटीला बसलेले ४० चोर कायमचे मातीत गाडले जातील. शिवसेनेमधील ही कीड कायमची संपून जाईल. त्यांना शिवसेनेने काय नाही दिले. अनेकांवर अन्याय करत त्यांना संधी दिली आहे. पण आता हे होणार नाही. असा अन्याय होईल तेव्हा आमच्यासारखे लोक उभी राहितील आणि सांगतील की हे होता कामा नये. हे लोक कुठून येतात आणि यांना कोण आणतं हे मला सगळं माहिती आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.