दहिवडी / प्रतिनिधी
तलवार व बंदुकीचा वापर करुन मलवडी (ता. माण) येथे 50 तो॓ळे सोने, 40 किलो चांदी व 7 लाख रुपये रोख लुटल्याची घटना आज सायंकाळी घडली. या खळबळजनक घटनेमुळे माण तालुक्यासह संपुर्ण सातारा जिल्हा हादरला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलवडी येथील बसस्थानक परिसरात मलवडी – बुध रस्त्याकडेला आर. एल. कॉम्प्लेक्स मध्ये श्रीकांत तुकाराम कदम यांचे जय भवानी ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर सायंकाळी साधारण साडेसातच्या सुमारास दुकानातील सर्व ऐवज तीन पिशव्या मध्ये भरला. यात चाळीस तोळे सोने, साधारण पन्नास किलो चांदी व सात लाख रुपये रोख असा ऐवज होता. या पिशव्या घेवून ते आपल्या दुचाकी वरुन पुतण्या श्रीजित शिवाजी कदम याच्यासोबत घरी निघाले होते.
सात चाळीसच्या दरम्यान मलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व त्रिंबकराव काळे विद्यालयाच्या मधील रस्त्याने जात असताना अचानक एकजण समोर आला. संशय आल्यामुळे त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात अजून तिघेजण धावत आले. त्यांनी श्रीजितला जोरात दणका दिला त्यामुळे श्रीकांत यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली पडली. गाडीवरून खाली पडलेल्या तीन पिशव्या दोघांनी उचलल्या व तिघे त्यांच्या दुचाकींकडे पळाले. तर एकाने तलवारीने श्रीजित याच्या हातावर तर नंतर श्रीकांत यांच्या खांद्यावर वार केला. अशा अवस्थेतही या दोघा चुलत्या-पुतण्यांनी मिळून या आरोपीला पकडून ठेवून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली.
आपला साथीदार परत आलेला नाही हे लक्षात येताच एकजण दुचाकीवरुन परत आला व त्याने बंदुकीतून तीन-चार वेळा गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी चुकवताना श्रीकांत यांनी पकडून ठेवलेल्या आरोपीस पुढे केल्याने त्याच्या पाठीला चाटून गेली. ही झटापट सुरु असतानाच ग्रामस्थ जमा होवू लागल्याने तीन चोरटे पळून गेले. सदर घटनेची दहिवडी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पकडलेल्या चोरट्यावर प्राथमिक उपचार करुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित चोरट्यांचा तपास वेगात सुरु असून रात्रीच उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली.