चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा ; निरोप समारंभावेळी सर्वजण झाले भावूक
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात शासनाच्या योजना राबवण्यासाठी खूप चांगले वातावरण आहे. येथील लोकप्रतिनिधेंचे चांगले सहकार्य मिळते. स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य मिळते. येथील अधिकारी चांगले काम करतात. म्हणूनच आजपर्यंत सातारा जिल्हा परिषद अग्रस्थानी राहिली आहे. हे सातारा जिल्हा परिषदेच्या यशाचे गमक आहे. जिल्हा परिषदेला आजपर्यंत मिळालेले पुरस्कार, झालेले गौरव हे माझ्या एकटय़ाचे श्रेय नसून सर्व टीमचे यश आहे, असे गौरवोद्गार मावळते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काढले.
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित नतून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी यांचा स्वागत सोहळा व मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचा समारोप आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई, मुख्य लेखाधिकारी विकास सावंत, जिल्हा कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विनय गौडा म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेचे प्रशासन चांगले आहे. लोकप्रतिनिधींचे सहकार्य राहिले आहे. सरकारी योजना राबवताना त्यामुळे अग्रस्थान राहिले आहे. त्याचे कारण सातारा जिल्हा परिषदेची टीम आहे. माझ्या टीमने चांगला परफार्मस दाखवत कॉन्ट्रीब्युशन दिले. मी 6 ऑक्टोबर 2020 ला साताऱयाला आलो. तेव्हा कोरोना संपत होता असे वाटले होते. परंतु दुसरी लाट सुरु झाली. तिकडे आठ महिने कोरोनाचे काम केले होते. तात्कालिन जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे चांगले कोआर्डीनेशन असल्याने दुसरी लाटेला चांगल्या प्रकारे सामोरे जाता आले. लोकांना चांगली सेवा देता आली. ऑक्सिजनचा इशू होता, तो पूर्ण करता आला. जलजीवन मिशन काम प्रगतीपथावर आहे. ही महत्वकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजनेच्या मध्यामातून गोरगरीबांना घरे देवू शकलो. महिला बचत गट चळवळीच्या माध्यमातून त्यांची अर्थिक उन्नती साधता आली. पर्यावरण संतूलन कसे राखता येतील, यासाठी स्वच्छ भारत मिशन आहे. हे सर्व बघायला, सातारामध्ये नवीन गोष्टी करायला मिळाल्या. साताऱयात काम करायला एक्सप्रेशन मिळते. येथील लोकांचा सपोर्ट मिळतो. मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएएसी आणि कांदाटी खोऱयाच्या विकास हे पुर्ण करु शकलो नाही, याची खंत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सुषमा देसाई, गटविकास अधिकारी उदय साळुंखे, भरत कोळेकर, विजय निंबाळकर, चंद्रकांत यादव, महेंद्र जानुगडे यांनी आपली मते मांडली. यावेळी जिह्यातील सर्व गटविकास अधिकारी, खातेप्रमुख यांची उपस्थिती होती. आभार मुख्य लेखाधिकारी विकास सावंत यांनी मानले.