उंबरीवाडीतील १० ते १२ घरांची पडझड; कास पुलावर पाणी; बामणोली भागातील वाहतूक बंद
कास / वार्ताहर
गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कास बामनोली परिसराला झोडपून काढले असून पावसाबरोबरच वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लोकांच्या अडचणीत भर पडली आहे. या मुसळधार पावसाने ढगफुटीसदृश्य परिस्थिती झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सोसोट्याच्या वाऱ्यामुळे य़ा परिसरातील १० ते १२ घरांची पडझड झाली आहे.
या पावसामुळे कास ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला असून बामणोली, तांबी, धावली, जुंगटी भागातील वाहतूक बंद झाली आहे. यावर्षी कास धरणाचे काम पूर्ण झाले असून पाणीसाठा दुपटीने वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नवीन सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून हे पाणी खूप जुन्या असलेल्या फरशी पुलावरून वाहत आहे. हा फुल लहान असल्याने पुलाच्या तोंडांमध्ये दगड मातीचा भराव येऊन गाळ बसला आहे. पाणी गटारींबाहेर पडल्याने ते रस्त्यावरून व पुलावरून वाहत आहे. एसटी विभागाने बामनोली विभागातील वाहतूक बंद केली असून पारंबे फाट्यापर्यंत गाड्या धावत आहेत. बामनोली बरोबरच कास परिसरातील जुंगटी, तांबी, धावली या परिसरातील वाहतुक ही विस्कळीत झाली आहे. बामणोली व तांबी परिसरातील गावांना जाण्यासाठी सह्याद्री नगर एकीव पारांबे या मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे पोल वाकले असून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. काही घरांचे छप्पर उडाल्याने नुकसान झाले आहे तर शेतीचे बांध तुटल्याने पिकांमध्ये पाणी साचून नुकसान झाले आहे.
जावली तालुक्यातील उंबरी वाडी गावातील विष्णु सखाराम सावंत, विष्णु नारायण जाधव, शिवाजी किसन जाधव, आनंद रामचंद्र जाधव, तानाजी पांडुरंग जाधव, आनंद नारायण जाधव, सुरेश रामचंद्र जाधव, अशोक गणपत जाधव, विजय रामचंद्र जाधव आदी १० ते १२ जणांच्या घराची पडझड झाली असुन सातारा तालुक्यातील जुंगटी, जळकेवाडी, तांबी आदी गावातीलही अनेक घरांची पडझड झाल्याची माहीती समोर आली आहे