ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (jayashree jadhav) आणि भाजपचे उमेदवार सत्यजित कदम (satyajit kadam) यांच्यात चुरशीची लढत होत असल्यामुळे एक-एक मतांसाठी नेत्यांसह उमेदवाराला आपली ताकद पणाला लावावी लागली आहे. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यांनतर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर येथे मतदान केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली.
सोमवारी मंगळवार पेठ येथे भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता मोहिते यांच्या कार्यालयात पैसे वाटत असल्याचा प्रकार समोर आला. पैसे वाटणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यावर बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजपला जनाधार नसल्याने ते पैसे वाटत आहेत. त्याला जनता योग्य उत्तर देईल. पराभव दिसू लागल्याने भाजप पैसे वाटत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, आज सकाळी प्रचंड उत्साहात मतदान सुरवात झाली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही मतदान केले. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, भाजपने पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न केले, हा प्रयत्न जनता हाणून पाडेल. सिलेंडर दर वाढले आहेत, सर्व सामन्याचे कंबरडे मोडले आहे, त्याचे योग्य उत्तर जनता मतदानातून भाजपला देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सोमवारी भाजप उमेदवाराला मतदान करावे यासाठी पैसे वाटण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. यावर चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांच्या कारवाईवर शंका घेतली होती. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, पोलिसांच्या कामावर शंका घेतात का? चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यावर सारवासारव करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजप पैसे घेऊन मते घेत आहे हे स्पष्ट झाले आहे. तसेच लोकांचा जनाधार नसल्याने भाजपने पैसे वाटले. तसेच ज्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले त्यांची दादांनी ईडी चौकशी लावावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.
आमदार ऋतुराज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांनी कसबा बावडा येथील राजश्री शाहू विद्या मंदिर येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी जयश्री ताईच्या विजयाबद्दल विश्वास आहे. कारण चंद्रकांत जाधव यांचे मोठे कार्य या दोन वर्षांमध्ये कोल्हापूर शहराने अनुभुवले आहे. खऱ्या अर्थाने जयश्री वहिनींना मोठे पाठबळ शहरांमधून मिळतं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की कोल्हापूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने चांगले विचार आता पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी जयश्री यांच्या रूपाने मिळणार आहे.