आमचे तगडे उमेदवार जाणीवपूर्वक बाद करण्यात आले हे आम्ही निवडणूक जिंकू न शकल्याचे एक कारण असून विरोधकांनी खोटी आधारकार्ड तयार करून मतदान केलं असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. आमचा पराभव झाला हे आम्ही मान्य करतो. यापुढेही निवडणुका होतील त्यामुळे एका निवडणुकीनं खचून जाण्याचं कारण नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. राजाराम कारखान्याच्या निकालानंतर त्यानी आज पत्रकारपरिषद घेऊन प्रतिक्रिया दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही त्याची काही महत्वाची कारणं आहेत. आमचे तगडे उमेदवार विरोधकांनी जाणीवपूर्वक बाद केले. तसेच बाहेरच्या काही वाढीव सभासदांमुळे हा पराभव झाला असून आम्ही आमचा पराभव स्विकार करतो.” असे स्पष्टीकरण दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “या निवडणुकीत प्रचाराची पातळी खूपच खाली गेली. ती जायला नको होती. आता सत्ताधारी यांनी जी आश्वासन दिली त्या पूर्ण करावीत. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या सभासदांच्या पाठीशी सतेज पाटील गट कायम राहणार आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी बोलताना त्यांनी “सत्ताधाऱ्यांना अपेक्षित होते तेव्हढे मतदान झालं नाही. या निवडणूकीत वाढीव सभासद हाच मुद्दा महत्वाचा ठरला आहे. तसेच खोटे आधारकार्ड तयार करून मतदान करण्याचाही प्रकार घडला. खोटे आधारकार्ड असलेले 200 मतदार आपल्या कार्यकर्त्यांनी मागे घालवली. कसबा बावड्यात गेल्या वेळी मतं मिळाली तितकीच मतं त्यांना मिळाली आहेत. बावड्यातील मृत सभासदांचे शेअर्स सत्ताधाऱ्यांनी ट्रान्स्फर केले नाहीत. ती जर झाली असती आमची आणखी मतं वाढली असती.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.