इतक्या वर्षात एकाही व्यक्तीने भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही पण विरोधक राजाराम कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत. सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील कोणत्याही चौकात चर्चेसाठी बोलवावं मी तयार आहे असे जाहीर आवाहन माजी आमदार अमल महाडीक यांनी सतेज पाटील यांना केले. ते आज आपल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडीक उपस्थित होते.
आक्रमक भुमिका घेत माजी आमदार अमल महाडीक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “सतेज पाटील यांनी आपल्या साखर कारखान्याचे सभासद एका रात्रीत कमी केले होते त्याचे पहिल्यांदा त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. इतक्या वर्षात एकाही व्यक्तीने राजाराम कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला नाही. पण सतेज पाटील तो वारंवर करत आहेत त्यांनी तो सिद्ध करून दाखवावा. त्यासाठी सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील कोणत्याही चौकात चर्चेसाठी बोलवावं” असे थेट आव्हान अमल महाडीक यांनी आमदार सतेज पाटील यांना दिले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “तुम्ही महादेवराव महाडिक यांचा हात धरून तुम्ही राजकारणामध्ये आलात हे सभासद विसरलेले नाहीत. विरोधकांनी राजाराम कारखान्याच्य़ा खाजगीरणाचा डाव आखला आहे. मात्र महादेवराव महाडिक यांनी हा कारखाना खाजगी होऊ दिला नाही. अर्ज भरताना सभासद किती आणि कार्यकर्ते किती होते ते पहा…विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी वरिष्ठ नेत्यांचे आदेश म्हणून मी माघार घेतली होती. वरिष्ठ नेत्यांचा आदेश आणि मी मनाचा मोठेपणा दाखवला होता. त्यावेळी काय चर्चा झाली हे सतेज पाटील यांना विचारा.” असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात बोलताना शेवटी ते म्हणाले, “हे कालचक्र आहे हे सगळ्यांना त्याच मार्गातून जावं लागणार आहे. महाडिक कुटुंबाला नागरिक कंटाळले असं म्हणणाऱ्यांना समोर आणा. असं झालं तर मी राजकारणातून संन्यास घेईन. आमच्या झोळीत काय आहे हे ज्याची कुवत आहे त्याला कारखान्याचा निकाल समोर आल्यानंतर सगळ्यांना समजून ते येईल. जो मागत असतो त्याला शंकर देत असतो त्यामुळेच आमच्या पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ शंकराच्या मंदिरातून करणार आहोत.” असे अमल महाडीक यांनी जाहीर केले.