प. बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढविण्यासाठी मोठी जबाबदारी : भाजप पक्षाध्यक्षांचा आदेश
प्रतिनिधी / पणजी
भारतीय जनता पार्टीचे गोव्याचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, जे कार्य केले त्याची दखल घेऊन पक्षाने त्यांची कोलकाता येथे संघटनात्मक बाजू सांभाळण्यासाठी मोठी जबाबदारी सोपविली आहे. तथापि, पक्षांतर्गत त्यांच्या बदलीने एकच खळबळ माजली असून परस्पर विरोधी प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या. सतीश धोंड यांच्याशी संपर्क साधला असता ते केवळ हसले व कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दर्शविला.
गोव्यात भारतीय जनता पार्टीचे काम पडद्याआड राहून महत्त्वाची जबाबदारी स्वीकारुन कार्य करणाऱया संघटनमंत्री सतीश धोंड यांच्यासह पक्षश्रेष्ठींनी अर्थात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तीन नेत्यांच्या बदल्या केल्या आहेत. सतीश धोंड हे मंत्री विश्वजित राणे यांच्या जास्त संपर्कात होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असले तरी विश्वजित राणे यांच्या विविध कार्यक्रमांना ते प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह उपस्थित राहिलेले आहेत.
निवडणुकी दरम्यान, काही आमदार वा संभाव्य उमेदवारांच्या तक्रारी होत्या त्या त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडल्या होत्या. तथापि, विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपने अपेक्षेपेक्षाही जादा यश प्राप्त केले. याचे सारे श्रेय हे सतीश धोंड यांना जात नसले तरी देखील धोंड यांनी पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासमवेत पक्षासाठी केलेले कार्य, धोरण व निवडणूक नीती राबविताना महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
सतीश धोंड यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य असून त्यांच्या या कौशल्याचा वापर प. बंगालमध्ये व्हावा या उद्देशाने त्यांची बदली कोलकाता येथे केली आहे. बंगालमध्ये भाजपला आपली चांगल्या पद्धतीने रणनीती आखता आली नव्हती. आता लोकसभा निवडणुका 20 महिन्यानंतर येऊन ठेपलेल्या आहेत. बंगालमध्ये जास्तीत जास्त जागा पटकाविण्याचा भाजपचा इरादा आहे. त्या दृष्टीने आतापासून भाजपला बंगालमध्ये फिल्डींग लावण्याची इच्छा आहे. त्या अनुषंगाने सतीश धोंड यांना तिथे पाठविण्यात आले आहे व त्यांच्या कौशल्याचा वापर बंगालमध्ये करण्याचा भाजप नेत्यांचा इरादा आहे.
तथापि, या बदलीमुळे भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे. पक्षांतर्गत उलट सुलट जोरदार चर्चेला प्रारंभ झालेला आहे. मात्र सतीश धोंड हे गप्पच राहिलेले आहेत. सहसा गोव्यातील नेते हे इतर राज्यात जास्तीत जास्त काळ टिकू शकत नाही. त्यातल्या त्यात कोलकाता येथे जाणे सतीश धोंड यांना परवडणारे नाही. भाषेचा प्रश्न जटील आहे. एकवेळ महाराष्ट्रात नियुक्ती झाली तर ते त्यांना सहज परवडणारे आहे. बदली करताना बिगर भाजप राज्यात नियुक्ती झाली आहे आणि त्यातल्या त्यात बंगाली भाषा येत नाही. तसेच बंगालमध्ये भाजपवाले सुरक्षित नाही. मात्र सतीश धोंड हे पक्षादेश मानणारे आहेत. त्यामुळे तिथे जाण्यावाचून त्यांना पर्याय नाही.