मणेराजूरी / वार्ताहर
तासगाव तालुक्यातील सावर्डे येथील भवानी डोंगराच्या येथे वन विभागाच्या सुमारे २० ते २५ एकर डोंगराला आग लागून या आगीची झळ वनराईसह सरपटणाऱ्या शेकडो जीवांना बसली. तासगाव वनविभाग, तासगावचा अग्निशामक विभाग, चिंचणी सावर्डे, मणेराजुरी आदी गावतील युवक व ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग दोन तासांनी आटोक्यात आली.
तासगाव तालुक्यातील मणेराजूरी -सावर्डे येथे भवानीचा डोंगर आहे. हा डोंगर चिंचणी, सावर्डे ,मणेराजुरी या गावच्या तसेच वन विभागाच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावर पसरला आहे. या डोंगरावर दरवर्षी वनविभाग व वृक्ष प्रेमी शेकडो झाडांची लागवड तसेच बियांची टोकन करतात. या डोंगरात कोल्हा, तरस लांडगा, मुंगूस, सायाळ, घुबड, मोर,लांडोर,लाव्हार, चित्तर, घोरपड, नाग, चिमण्या, साळुंख्या, पोपट,घारी, खोकड, यांसह शेकडो प्राणी पक्षी व वनसंपदा आहे.
सध्या डोंगरावर करवंदांची मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली असून ती पक्व होण्याच्या मार्गावर आहे. डोंगरावर पावसाळ्यात गुरांना चरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गवत उगवते.
शुक्रवारी दुपारी चार साडेचार च्या दरम्यान चिंचणी गावच्या हद्दीत डोंगराला आग लागल्याचे काही ग्रामस्थ व वृक्ष वृक्षप्रेमींना समजले. माहिती मिळतात संबंधित मंडळींनी डोंगराकडे धाव घेतली तर काहीजणांनी तासगाव वन विभाग व तासगावच्या अग्निशामक विभागाला याची खबर देत आग विझवण्यासाठी येण्याचे आवाहन केले. वारा वेगाने वाहात असल्याने आग वेगाने वाढत होती. हा हा म्हणता आगीने रौद्ररूप धारण करत ती वेगाने पसरू लागली. जवळपास पाणी किंवा अन्य काही विझवण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरत होती. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आगीची माहिती मिळताच तासगाव वनविभागाचे वनसंरक्षक रवींद्र कोळी यांच्यासह वन विभागाच्या पाच ते सहा कर्मचाऱ्यांनी तात्काळ डोंगर गाठला व आग विझवण्यास सुरुवात केली. आगीची माहिती मिळताच तासगावचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी अग्निशामक दलाची गाडी तात्काळ सावर्डे येथे पाठवली. मात्र आग खालून वरती डोंगरावर पसरत गेल्याने अग्निशामक दलाच्या गाडीच्या जवानांचा नाईलाज झाला. आग विझवण्यासाठी जाणाऱ्या मंडळींना पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नसल्याने आग विझवण्यास अडथळे येत होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यास वनविभाग, वृक्षप्रेमी व स्थानिक मंडळींना त्यात यश आले. या आगीत २० ते २५ एकर क्षेत्र भक्षस्थानी पडले. मात्र वरील सर्वांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण डोंगर जळण्यापासून बचावला.
आगीचे कृत्य अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आल्याचे समजते. आग लावण्याने वाळलेले गवत जळत जाऊन पावसाळ्यात नवीन गवत चांगल्या पद्धतीने फुटते असा समज काही गुराखी मंडळींचा आहे व त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या समजूतीतूनच आगी लावण्याचे भयानक प्रकार होत आहेत. ही आग विझवण्यासाठी रविंद्र कोळी वनरक्षक,दत्तात्रय बोराडे वनरक्षक, दत्तात्रय मोहिते, धोंडीराम घुले,ग्रामस्थ पोपट जाधव ,रामभाऊ जाधव, भाऊसो जाधव ,संतोष जाधव,मंदिर पुजारी यांनी प्रयत्न केले.