मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
रत्नागिरी प्रतिनिधी
गेले आठवडाभर रत्नागिरीसह राज्यात पाच ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. याची सांगता रविवारी 28 मे रोजी शोभायात्रा, सहभोजनाने झाली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमासाठी ऐतिहासिक पतितपावन मंदिराची निवड झाली. या कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
पहा VIDEO >>> मोठ लक्ष गाठण्यासाठी छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण आवश्यक आहे: लोढा
महाराष्ट्र शासनाने वीरभूमी परिक्रमेअंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव इथपर्यंत बाईक रॅली, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प, त्या तिघी नाट्यप्रयोग, विनायका रे हा संगीतमय कार्यक्रम रंगला. कारागृह सावरकर स्मारक येथून शोभायात्रेला सुरवात झाली. वीर सावरकरांची १४० वी जयंती निमित्त कारागृह येथील स्वा. सावरकर स्मारक येथून शोभायात्रा निघाली. जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रेची सांगता झाली. यामध्ये विविध संस्थांचे चित्ररथ सहभागी होते.
शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचल्यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते झाला. ११.३० वाजता सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. त्याचा मोठ्या संख्येने नागरिकांनी आस्वाद घेतला. या सर्व कार्यक्रमांना सावरकरप्रेमी, हिंदुत्ववादी संस्था, संघटनांनी सहभाग घेतला होता संयोजक रवींद्र भोवड, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, माजी अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी ॲड. विनय आंबुलकर आदी मान्यवर, नागरिक उपस्थित होते.