विद्यार्थ्याच्या खुनानंतर प्रश्नांची मालिका : समाजमन चिंतित करणाऱया घटना, शालेय विद्यार्थ्यांवर वेळीच आवर घालण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
जन्मतःच कोणी गुन्हेगार नसतो. आयुष्यात घडणाऱया बऱया-वाईट घटना, सामोरे जावे लागणारे प्रसंग आदींमुळे काही वेळा कळत-नकळत एखाद्याच्या हातून गुन्हा घडतो. गुन्हेगारी प्रवृत्तीपासून माणसाला दूर ठेवण्याचे काम शिक्षणाने घडते. जर शिक्षण घेतानाच शाळेत घडलेल्या क्षुल्लक कारणावरील भांडणाचे रुपांतर खुनात घडले तर शिक्षणाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जातो.
गेल्या आठवडय़ात प्रज्ज्वल शिवानंद करेगार (वय 16) रा. शिवाजीनगर पाचवा क्रॉस या विद्यार्थ्याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला. शतकाचा इतिहास असलेल्या जी. ए. हायस्कूलमध्ये दहावीत शिकणाऱया प्रज्ज्वलचे त्याच शाळेत शिकणाऱया मित्रांनी बुधवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अपहरण करून मुचंडी, ता. बेळगावजवळील एका आमराईत खून करून मृतदेह टाकून दिल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी लक्ष्मण यल्लाप्पा होसमनी (वय 19) रा. खनगाव बी. के. या तरुणासह आणखी दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी खुनाच्या घटनेनंतर केवळ तीन-चार दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला आहे. नेहमीप्रमाणे शाळेला गेलेल्या प्रज्ज्वलचे 19 ऑक्टोबर रोजी शाळा सुटल्यानंतर अपहरण करण्यात आले होते.
याआधी क्षुल्लक कारणावरून घडलेल्या मारामारी प्रकरणात मांडवली करण्यासाठी त्याला मोटारसायकलवरून शाळा सुटल्यानंतर मुचंडीला नेण्यात आले. मुचंडीजवळील आमराईत तलवारीने वार करून व दगडाने ठेचून या विद्यार्थ्याचा भीषण खून करण्यात आला. शाळेला गेलेला मुलगा शाळा सुटल्यानंतरही घरी परतला नाही, या चिंतेने ग्रासलेल्या त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता न लागल्याने सुरुवातीला मार्केट पोलिसांना प्रज्ज्वल बेपत्ता असल्याची माहिती दिली होती.
जर अल्पवयीन मुले बेपत्ता झाली तर कायद्यानुसार अपहरण प्रकरण दाखल केले जाते. प्रज्ज्वल जी. ए. हायस्कूल समोरून बेपत्ता झाला होता. त्यामुळे दुसऱया दिवशी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला. हायस्कूलसमोरील सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झालेल्या फुटेजमुळे अपहरण प्रकरणाचा उलगडा झाला. मोटारसायकलवरून त्याला नेणारे कोण होते? याचीही माहिती तपास अधिकाऱयांना मिळाली. त्यांचा शोध सुरू असतानाच मुचंडीजवळील आमराईत अर्धनग्न अवस्थेतील प्रज्ज्वलचा मृतदेह आढळला.
अत्यंत क्षुल्लक कारणामुळे अपहरण करून खून
खुनासाठी अनेक कारणे असतात. जमीनवाद, आर्थिक व्यवहार, अनैतिक संबंध, कर्ज प्रकरण, प्रेम प्रकरण, पूर्ववैमनस्य अशा अनेक कारणांमुळे जीव घेतला जातो. मात्र, 16 वर्षांच्या विद्यार्थ्याचा खून कोणी व कशासाठी केला? या प्रश्नाने तपास अधिकारीही हैराण झाले होते. दोन अल्पवयीन मुले व लक्ष्मण होसमनी या 19 वषीय तरुणाला अटक करून त्यांची चौकशी केल्यानंतर तपास अधिकाऱयांना धक्काच बसला. अत्यंत क्षुल्लक कारणामुळे त्याचे अपहरण करून खून केला.
नको त्या गोष्टीमुळे जनमानसाला धक्का
प्रज्ज्वलचा भाऊ याच शाळेत नववीत शिकतो. त्याला एका विद्यार्थ्याने मारहाण केली होती. भावाला मारणाऱयाला जाब विचारताना प्रज्ज्वलने त्याच्यावर हात उगारला होता. त्यानंतर एखाद्या सराईत गुन्हेगारांप्रमाणेच नियोजनबद्धरित्या अपहरण करून प्रज्ज्वलचा जीव घेण्यात आला. विद्यार्थीदशेत दोन अल्पवयीन मुलांसह तिघा जणांनी अत्यंत सफाईदारपणे हे काम तडीस नेले. शालेय विद्यार्थ्यांनी नको त्या गोष्टीसाठी लढविलेल्या मेंदूमुळे संपूर्ण जनमानसाला धक्का बसला आहे.
बेळगावात एकेकाळी टोळीयुद्धाची सुरुवातच कॉलेज आवारातून हप्ते गोळा करण्यावरून झाली होती. टोळीयुद्धात अनेक तरुणांचे बळी गेले आहेत. काहींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. शिक्षण संस्थांमध्ये जीवन घडविण्याचे काम चालते. तेथूनच गुन्हेगारीचाही धडा गिरविला जात असल्यास भावी समाज कसा निर्माण होईल, या चिंतेने सर्वांनाच ग्रासले आहे.
शाळेत गेलेला मुलगा वेळेत घरी येतो की नाही? त्याचे मित्र कसे आहेत? त्याची मैत्री कोणाशी आहे? अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्या गैरप्रकारात तो गुंतला आहे का? यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांवर असते. शाळेत मुलांमध्ये अधूनमधून होणारी भांडणे तेथेच मिटवून संघर्ष पेटू नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी शिक्षकांवरही असते. पूर्वी एखादा विद्यार्थी चुकला तर शिक्षक त्याचा खरपूस समाचार घ्यायचे. प्रसंगी त्याला मारबडवही करायचे. शिक्षकांनी दिलेली ही शिक्षा आपल्या पाल्याच्या चांगल्यासाठीच असल्याची भावना पालकांमध्ये असायची. त्यामुळे या शिक्षेला पालकांचीही संमती असायची. मात्र आजकाल शिक्षकांना शिक्षा देण्याची अनुमती नाही. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यावर जर हात उगारला तर सर्वप्रथम पालकच त्या शिक्षकाची कानउघाडणी करतात. शाळा व्यवस्थापनावर दबाव आणून त्या शिक्षकांवर कारवाईची मागणीही करतात. अशाने शिक्षकांनीही विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे सोडून दिले आहे.
पोलीस खात्याने आताच लक्ष देणे काळाची गरज
दहावी-बारावीत शिक्षण घेणारी मुले आपल्याच मित्राच्या खुनासाठी तलवार बाळगतात. तलवारीने हल्ला केल्यानंतरही त्याचा मृत्यू झाला आहे की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी डोक्मयात दगड घालतात. बालमनात इतके क्रौर्य कुठून आले? याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेळगाव पुन्हा टोळीयुद्धाच्या उंबरठय़ावर उभे ठाकले आहे का? याची सूतराम शक्मयताही दिसत असल्यास पोलीस खात्याने आताच ऍक्शन मोडमध्ये येऊन त्यावर आळा घालणे काळाची गरज आहे.