झाकीर हसन, दास यांची अर्धशतके ः भारताला विजयासाठी 100 धावांची तर बांगलादेशला 6 गडय़ांची गरज
वृत्तसंस्था/ मिरपूर
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशीअखेर दोन्ही संघांना विजयाची समान संधी उपलब्ध झाली आहे. भारताला विजयासाठी 100 धावांची गरज असून बांगलादेशला मालिका बरोबरीत राखण्यासाठी 6 गडी बाद करणे आवश्यक आहे. ही खेळपट्टी फिरकीला अधिक अनुकूल असल्याने भारतीय फलंदाजीची रविवारी सत्त्वपरीक्षा ठरेल. या सामन्यातील तिसरा दिवस पुन्हा गोलंदाजांनी गाजवताना 14 बळी नोंदविले गेले.
या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून बांगलादेशवर आघाडी घेतली आहे. यजमान बांगलादेशला ही मालिका बरोबरीत सोडविण्याची नामी संधी त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी उपलब्ध करून दिली आहे. या सामन्यातील खेळाचे पहिले तीन दिवस गोलंदाजांनी गाजविले. बांगलादेशच्या दुसऱया डावात झाकीर हसन आणि लिटॉन दास यांची अर्धशतके महत्त्वाची ठरली. भारतातर्फे अक्षर पटेल तसेच उनादकट आणि मोहम्मद सिराज यांची गोलंदाजी प्रभावी झाली.
या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा जमविल्यानंतर भारताने पहिल्या डावात 314 धावा जमवित 87 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. 87 धावांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेश संघाने बिनबाद या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 231 धावात आटोपला. त्यामुळे भारताला निर्णायक विजयासाठी 145 धावांचे आव्हान बांगलादेशकडून मिळाले, पण खेळाच्या शेवटच्या सत्रात मेहदी हसन मिराजच्या फिरकीसमोर भारताची फलंदाजी कोलमडली. भारताने दिवसअखेर 23 षटकात 4 बाद 45 धावा जमविल्याने बांगलादेशला विजयाची आशा निर्माण झाली आहे. भारताच्या दुसऱया डावामध्ये शुभमन गिल, कर्णधार राहुल, पुजारा आणि विराट कोहली हे चार महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. फलंदाजीत बढती मिळालेला अक्षर पटेल 26 तर नाईट वॉचमन उनादकट 3 धावांवर खेळत आहेत. रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी भारताला आणखी 100 धावांची गरज असून त्यांचे सहा गडी खेळावयाचे आहेत. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीवरच भारताचा विजय अवलंबून आहे.
बांगलादेशच्या दुसऱया डावात सलामीच्या झाकीर हसनने 136 चेंडूत 5 चौकारांसह 51 तर लिटॉन दासने 98 चेंडूत 7 चौकारांसह 73, तसेच नुरुल हसनने 29 चेंडूत 31 धावा आणि तस्कीन अहमदच्या 46 चेंडूतील 31 धावांच्या योगदानामुळे बांगलादेशला 231 धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशच्या दुसऱया डावामध्ये भारताचे क्षेत्ररक्षण दर्जाहीन झाले. कोहलीने स्लिपमध्ये तीन सोपे झेल सोडले. त्यामुळे बांगलादेशला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. लिटॉन दासने तस्कीन अहमदसमवेत आठव्या गडय़ासाठी 60 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी दासने नुरुल हसनसमवेत सातव्या गडय़ासाठी 46 धावांची भर घातली. नुरुल हसनने आपल्या 31 धावांच्या खेळीमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. तिसऱया दिवसाच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर अश्विनने सलामीच्या नजमुल हुसेनला 5 धावांवर पायचित केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने मोमीनुल हकला 5 धावांवर झेलबाद केले. उनादकटच्या स्वींग गोलंदाजीवर कर्णधार शकीब अल हसन गिलकरवी झेलबाद झाला. त्याने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. अक्षर पटेलने रहीमला 9 धावांवर पायचित केले. उमेश यादवने झकीर हसनला सिराजकडे झेल देण्यास भाग पाडले. अक्षर पटेलने बांगलादेशला आणखी एक धक्का देताना मेहदी हसन मिराजला खाते उघडण्यापूर्वीच पायचित केले. बांगलादेशची स्थिती यावेळी 6 बाद 113 अशी होती. यानंतर लिटॉन दास, नुरुल हसन आणि तस्कीन अहमद यांनी चिवट फलंदाजी केली. भारतातर्फे अक्षर पटेलने 68 धावात 3 तर मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 2, उमेश यादव व उनादकट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
मेहदी हसनचे तीन बळी
चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात मेहदी हसनच्या फिरकीसमोर भारताचा दुसरा डाव कोलमडला. डावातील तिसऱयाच षटकात शकीब अल हसनने कर्णधार राहुलला नुरुल हसनकरवी झेलबाद केले. त्याने 2 धावा जमविल्या. बांगलादेशच्या कर्णधाराने मेहदी हसनकडे चेंडू सोपविल्यानंतर त्याने चेतेश्वर पुजाराला यष्टीरक्षक नुरुल हसनकरवी यष्टीचित केले. पुजाराने 1 चौकारासह 6 धावा केल्या. मेहदी हसनने गिलला 7 धावांवर पुन्हा यष्टीरक्षक हसनकरवी यष्टीचित केले. विराट कोहली सुरुवातीपासूनच चाचपडत फलंदाजी करत होता. मेहदी हसनच्या चेंडूवर मोमिनूल हकने त्याचा अप्रतिम झेल घेतला. कोहलीने 22 चेंडूत केवळ एक धाव जमविली. फलंदाजीत बढती मिळालेल्या अक्षर पटेल 54 चेंडूत 3 चौकारांसह 26 धावांवर तर उनादकट 3 धावांवर खेळत आहेत. बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने 12 धावात 3 तर शकीब अल हसनने 21 धावात 1 गडी बाद केला. रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पहिल्या तासाचा खेळ दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश प. डाव 227, भारत प. डाव 314, बांगलादेश दु. डाव 70.2 षटकात सर्वबाद 231 (लिटॉन दास 73, झाकीर हसन 51, नुरुल हसन 31, तस्कीन अहमद 31, शकीब अल हसन 13, अक्षर पटेल 3-68, मोहमद सिराज 2-41, रविचंद्रन अश्विन 2-66, उनादकट 1-17, उमेश यादव 1-32), भारत दु. डाव 23 षटकात 4 बाद 45 (गिल 7, राहुल 2, पुजारा 6, कोहली 1, अक्षर पटेल खेळत आहे 26, उनादकट खेळत आहे 3, मेहदी हसन मिराज 3-12, शकीब अल हसन 1-21).