अनेकांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे : वळिवाने दिला हात : पेरणी-मशागतीच्या कामांना पावसाची नितांत गरज
प्रतिनिधी / बेळगाव
यंदा मृग 8 जूनपासून सुरूवात होणार, असे भाकित पंचांगांतून वर्तविण्यात आले होते. मात्र, मृगाचा अद्याप पत्ता नाही. सध्या पाणी नसल्याने अनेकांचे जीव कासावीस होताना दिसत आहेत. अनेकांचे डोळे आकाशाकडे लागून राहिले आहेत. वळिवाने दगा दिला आता, मान्सून तरी बरसेल आणि शेतीकामांना वेग येईल, अशी आशा सर्वांना आहे. मात्र पावसाचा अद्याप पत्ताच नाही. ढग दाटून येत आहेत. पण, पाऊस कधी बरसणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पाऊस नसल्याने सर्व कामे रेंगाळली आहेत. पाणी समस्या आवासून उभी आहे. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागून राहिल्या आहेत.
या वर्षी वळिवाने हुलकावणी दिल्याने पाणी पातळीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. परिणामी विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. शहरात अनेक नागरिकांच्या विहिरी आहेत. तसेच सार्वजनिक विहिरीही आहेत. परंतु शहरातील अनेक भागातील सर्रास विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे पाणी पुरवठा विभागाकडून आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागत आहे.
अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई
बेळगाव जिह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्मयातही काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तब्बल आठवड्यातून एकदा केला जात आहे. काही गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. पाणी टंचाई दूर करण्यासाठी सरकारने मोठा निधी उपलब्ध केला आहे. पण जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून पाण्यासाठी कोणत्याच ठोस अशा योजना राबविण्यात आल्या नाहीत. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
10 ते 15 दिवसांआड पाणीपुरवठा
कमी पावसामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असून 10 ते 15 दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. अनेकांनी सध्या विहिरींमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. बेळगाव परिसरात पाण्याची पातळी चांगली असते. कधी एकदा मान्सून येतो आणि शेतीबरोबरच पिण्याच्या पाणी समस्या मिटवितो, असेच आता साऱ्यांना वाटत आहे.
काही गावात तर बऱ्याच दिवसांनंतर नळाला पाणी आल्याने ते दूषित असण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या गावांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षीच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असते. मात्र वारंवार होणाऱ्या या समस्येवर उपाय करण्यावर प्रशासन का लक्ष देत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
अनेक अपार्टमेन्टमध्ये एकच विहिरीचा पाणीपुरवठा केला जातो. परंतु या विहिरींमधीलही पाणी कमी झाल्याने अपार्टमेन्टमधील नागरिकांना आठवड्यातून एकदा येणाऱ्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. पाण्याचा पुरवठा व्यवस्थित करावा यासाठी नागरिक पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी करीत आहेत.
साऱ्यांची भिस्त आता पावसावरच
पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ तासभरच पाणी मिळत आहे. त्यामुळे पिके सुकून जात आहेत. तर मशागत व पेरणी झालेल्या पिकांनाही आता फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर आणखीन काही दिवस पाऊस लांबल्यास पिके सुकून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता साऱ्यांची भिस्त पावसावरच आहे.