मणिपाल टायगर्सचे नेतृत्व हरभजनकडे, इरफान पठाण भिलवाडा किंगचा कर्णधार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
16 सप्टेंबरपासून खेळविल्या जाणाऱया दुसऱया लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेसाठी विविध संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी गुजरात जायंट्स संघाच्या कर्णधारपदी भारताचा माजी सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवागची तसेच इंडिया कॅपिटल्स संघाच्या कप्तानपदी भारताचा माजी सलामीचा फलंदाज आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मणिपाल टायगर्स आणि भिलवाडा किंग या संघांचे नेतृत्व अनुक्रमे हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
2011 साली आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळविणाऱया भारतीय संघामध्ये हरभजनचा समावेश होता. दुसऱया लिजेंड्स क्रिकेट स्पर्धेसाठी हरभजनकडे मणिपाल टायगर्सचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भिलवाडा किंग संघाच्या कर्णधारपदी इरफान पठाणची घोषणा केली आहे. देशातील क्रिकेट शौकिनांना माजी क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी या स्पर्धेने उपलब्ध करून दिली आहे. हरभजनने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत कसोटीत 417 बळी मिळविले आहेत. त्याने 103 कसोटी, 236 वन डे आणि 28 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
बडोदाचा रहिवासी इरफान पठाणने आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय संघात आपले स्थान बरेच दिवस राखले होते. 2007 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात इरफान पठाणने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.
भारताचा माजी सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याची गुजरात जायंट्सच्या तसेच गौतम गंभीरची इंडिया कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अदानी उद्योग समूह हा गुजरात जायंट्सचा प्रमुख फ्रँचायझी आहे. तर इंडिया कॅपिटल्सचे फ्रँचायझी जीएमआर स्पोर्ट्सलाईन आहेत.
दुसरी लिजेंड्स क्रिकेट स्पर्धा 16 सप्टेंबरपासून कोलकात्याच्या ईडनगार्डन्स मैदानावर सुरू होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेतील सामने लखनौ, नवी दिल्ली, कटक आणि जोधपूर येथे खेळविले जातील. या स्पर्धेतील प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यांची ठिकाणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. सदर स्पर्धा पहिल्यांदाच भारतातील सहा विविध शहरांमध्ये खेळविली जात असल्याची माहिती या स्पर्धेचे सीईओ रमण रहेजा यांनी दिली.