अध्याय सत्ताविसावा
भजन पूजन मनापासून करणाऱ्या भक्ताला मिळणाऱ्या फलाबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, क्रियायोगाच्या भजनमार्गानं भक्त जर भोग व मोक्ष मागेल, तर त्या दोन्ही सिद्धी मी श्रीहरि त्यास तत्काल देतो. विशेष म्हणजे एखाद्या भक्ताने माझ्याकडे काहीच न मागता माझे भजनपूजन केले तर भोग-मोक्षादी संपत्ती घेऊन मी श्रीपती त्याच्या दारात सर्वकाळ तिष्ठत असतो. त्याला दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले भोग मी आपणहून त्याला बहाल करतो. काही भक्त धनवान असतात. त्यांनी त्यांच्या धनाचा सदुपयोग करून त्यांची भक्ती कशी वाढवावी आणि इतरानाही संतोष वाटण्यासाठी काय करावे याबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, आर्थिक सामर्थ्य असेल, तर उपासकाने सुंदर पक्के मंदिर बांधावे आणि त्यात माझ्या प्रतिमेची स्थापना करावी सुंदर फुलांचे बगीचे लावावेत, दररोजची पूजा, यात्रा आणि उत्सवांची व्यवस्था करावी. याबद्दल सविस्तर माहिती देताना ते म्हणतात, भक्तीमार्गाचा प्रसार व्हावा, माझी भक्ती करून माझ्या कृपेचा प्रत्यय अधिकाधिक लोकांना यावा ह्यासाठी माझे धनवान भक्त अत्यंत प्रेमाने व भक्तीने निर्व्यंग अशी माझी प्रतिमा करून सद्भावाने स्थापन करतात व मजबूत देवालय बांधतात. वन, उपवन, उद्यान, पुष्पवाटिका, इत्यादि भरपूर लावतात आणि विधीयुक्त नित्य पूजा करून उत्साहामध्ये महापूजा करतात पण नुसते देऊळ बांधून भागत नाही. मंदिरात देवाची स्थापना झाल्यावर पुढील दैनंदिन सोपस्कारही नीट चालायला हवेत अन्यथा त्या मंदिराला अवकळा यायला वेळ लगत नाही. असे होऊ नये म्हणून उपाय सांगताना भगवंत म्हणतात, देवाची यात्रा चालावी, बहुजनसमाज जमावा, वार्षिक पर्वात महापूजा व्हावी व ती अखंड चालावी, ह्या हेतूने जो मनुष्य विशेष उत्सव किंवा दररोजची पूजा नेहमी चालू राहावी, म्हणून शेती, जमीन, गाव माझ्या नावाने करून देतो, त्याला माझ्यासारख्या ऐश्वर्याची प्राप्ती होते. भगवंतांचे हे बोल लक्षात घेऊन नित्यपूजा, महापूजा किंवा वार्षिक पर्व नीट चालावीत म्हणून गावातील लोकाना राजा काही वर्षासने देऊन निर्वाहाची व्यवस्था लावतो. असे केल्याने त्याला माझे ऐश्वर्य प्राप्त होते. देवालयात मूर्तीची प्रतिष्ठा किंवा पूजा केली असता कर्त्याला काय फळ मिळते ते सांगताना भगवंत म्हणतात, माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने पृथ्वीचे एकछत्री राज्य, मंदिर बांधल्याने त्रैलोक्याचे राज्य, पूजा इत्यादींची व्यवस्था केल्याने ब्रह्मलोक आणि हे तीनही केल्याने माझी समानता प्राप्त होते. जो मूर्तीची प्रतिष्ठा करून ठेवतो, त्याला सार्वभौम राज्य प्राप्त होते, जो स्वत: देवालय करतो, तो त्रिभुवनाचा स्वामी होतो. जो पूजाविधान करतो तो सत्यलोकाला जातो. या तिन्ही गोष्टी जो करतो त्याला माझ्यासारखे ऐश्वर्य प्राप्त होते. असे हे तिन्ही साधक मनात काही उद्देश्य ठेवून किंवा काही अपेक्षा करून हे सर्व करत असले, तरी ते इच्छिलेल्या लोकाला जातात. निष्काम भक्त भगवंताना फार प्रिय असतात. अशा भक्तांना ते आपलं सर्वस्व द्यायला तयार असतात. निष्काम भक्तांना काय प्राप्त होते, त्याचे लक्षण मोठ्या आदराने व आनंदाने सांगताना ते म्हणतात, जो निष्कामभावाने माझी पूजा करतो, त्याला माझा भक्तीयोग प्राप्त होतो आणि त्या निरपेक्ष भक्तीयोगाने तो मलाच प्राप्त करून घेतो. निष्काम भक्तांच्या मनात माझ्याशिवाय अन्य विचारच नसतो. त्यामुळे मुख्यत्वेकरून मलाच अंत:करणांत धरून जे माझे निष्काम भजन करतात व निष्कामतेने जे अनन्य असतात, ते देहात असतानाच माझे रूप होतात. त्यामुळे त्यांच्यात व माझ्यात मुळीच भेद नसतो. अशा प्रकारे तो भक्त माझ्यात आणि मी भक्ताच्या आत व बाहेर, असे एकमेकात मिसळून नांदत असतो. गूळ जसा गोडीशी अभिन्न किंवा लाटा जशा समुद्राला अभिन्न असतात, त्याप्रमाणेच निजभक्तीपाशी तो व आम्ही अभिन्नरूपाने राहतो. याप्रमाणे जो निष्काम भक्ती करतो, तो चराचरामध्ये धन्य होय.